Fadnavis on Thackeray : ठाकरे ‘सडले’ म्हणाले, आता फडणवीस म्हणतात, सेनेच्या जन्माआधी मुंबईत आमचा नगरसेवक, अख्खी कुंडली मांडली?

| Updated on: Jan 24, 2022 | 1:22 PM

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजप सोबत लढलो असं सांगताना, हे भाजपसोबत असताना पहिल्या क्रमांकावर गेले. भाजपला सोडल्यावर चौथ्या क्रमांकावर गेले. हे सुद्धा लक्षात ठेवावे.

Fadnavis on Thackeray : ठाकरे सडले म्हणाले, आता फडणवीस म्हणतात, सेनेच्या जन्माआधी मुंबईत आमचा नगरसेवक, अख्खी कुंडली मांडली?
देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबईः मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी युतीतली आमची 25 वर्षे सडली, असा नुकताच घणाघाती हल्ला करत भाजपवर जोरदार टीका केली होती. या टीकेला आज चंद्रकांत पाटील यांच्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही जोरदार उत्तर देत हिशेब चुकता केला. फडणवीस यांनी अख्खी कुंडली मांडत शिवसेनेच्या जन्माआधीची मुंबईत भाजपचा नगरसेवक असल्याचे सांगितले. फडणवीसांनी काय दिले उत्तर, घ्या जाणून…

बाळासाहेबांनी सडवलं का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केल्यानंतर त्याला फडणवीस काय उत्तर देतात, याची उत्सुकता राजकीय क्षेत्रात होती. या प्रकरणावर आज फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या भाषणात सोयीचा इतिहास आणि सिलेक्टिव्ह विसर भाषणात पाहायला मिळाला. 25 वर्षे युतीत सडलो, असो ते म्हणत आहेत. 2012 पर्यंत बाळासाहेब ठाकरे युतीचे नेते होते. या युतीचा निर्णय त्यांनी केला होता. त्यांच्या हयातीत त्यांनी ही युती कायम ठेवली. याचा अर्थ बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात का? भाजपसोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवलं असं तुमचं म्हणणं आहे का, असा सवाल आमच्या मनात येतो, असा हल्लाबोल त्यांनी केला.

भाजपच्या तिकिटावर लढलात

फडणवीस म्हणाले, तुमची सिलेक्टिव्ह विसरण्याची पद्धत आहे. तुमचा पक्ष जन्माला येण्यापूर्वी मुंबईत आमचे नगरसेवक आणि आमदार होते. 1984 मध्ये तुम्ही भाजपच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवली. शिवसेनेच्या नाही. मनोहर जोशी हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली. फडणवीस पुढे म्हणाले की, भाजप सोबत लढलो असं सांगताना, हे भाजपसोबत असताना पहिल्या क्रमांकावर गेले. भाजपला सोडल्यावर चौथ्या क्रमांकावर गेले. याचा निर्णयही त्यांनी केला पाहिजे. कुणाकडे सडले. तेच तेच मुद्दे असतात. कदाचित शिवसैनिकांनाही तेच तेच भाषण पाठ झालं, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

तुमचा हिंदुत्वाशी संबंध काय?

फडणवीस म्हणाले की, राम जन्मभूमीच्या आंदोलनात कोण होते तुमचे. लाठ्याकाठ्या आम्ही खाल्ल्या. तुम्ही तोंडाची वाफ दडवली. कोण होते तुम्ही. राम मंदिर-बाबरी सोडून द्या. मोदींनी करून दाखवलं. त्यांच्या नेतृत्वात तयार होत आहे राम मंदिर. तुम्ही साधा दुर्गाडी किल्ल्याचा आणि मलंगगडाचा प्रश्न सोडवला नाही. तुमचा हिंदुत्वाशी संबंध काय, असा सवाल त्यांनी केला. आनंद दिघेंनी संघर्ष केला. तुमचा मुख्यमंत्री असताना तुम्ही मलंगगडाचा प्रश्न सोडवला नाही. आताही सोडवत नाही. तुमचं हिंदुत्व कागदावर आहे, अशी टाकाही त्यांनी केली.

इतर बातम्याः

Balasaheb Thackeray | उभ्या महाराष्ट्रावर गारूड करणारा बाळासाहेब नावाचा झंझावात…!

Nashik Trees | पर्यावरण मंत्र्यांच्या एका सूचनेमुळे 200 वर्षे पुरातन वटवृक्षासह 450 झाडे वाचणार, प्रकरण काय?

Jitendra Awhad | नाशिक महापालिकेने म्हाडाचे 700 कोटींचे नुकसान केले; आव्हाडांचा हल्लाबोल, चौकशी सुरू!