Nashik| मी या भाषेत फडफडत राहीन, कोलटकरच्या भिजक्या वहीवरचं कासव कवेत घेईन; अन् अख्खे कविसंमेलन भारावले…!

| Updated on: Dec 04, 2021 | 10:54 AM

निमंत्रितांच्या कविसंमेलनात ज्येष्ठ कवी श्रीधर नांदेडकर यांनी त्यांची 'अरुण कोलटकरचं कासव' ही अतिशय भावगर्भ कविता सादर केली. अन् कवी काही ओळीमध्ये काय चित्र उभं करू शकतो याची प्रचिती दिली. त्याने रसिक अक्षरशः भारावून गेले.

Nashik| मी या भाषेत फडफडत राहीन, कोलटकरच्या भिजक्या वहीवरचं कासव कवेत घेईन; अन् अख्खे कविसंमेलन भारावले...!
नाशिकच्या साहित्य संमेलनात ज्येष्ठ कवी श्रीधर नांदेडकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन रंगले.
Follow us on

कुसुमाग्रजनगरी, नाशिकः

मी या भाषेत फडफडत राहीन
मी कोलटकरच्या भिजक्या वहीवरचं
कासव कवेत घेईन
मला शेवटचा अश्रू सांभाळायचाय्

निमंत्रितांच्या कविसंमेलनात ज्येष्ठ कवी श्रीधर नांदेडकर यांनी त्यांची ‘अरुण कोलटकरचं कासव’ ही अतिशय भावगर्भ कविता सादर केली. अन् कवी काही ओळीमध्ये काय चित्र उभं करू शकतो याची प्रचिती दिली. त्याने रसिक अक्षरशः भारावून गेले. कुसुमाग्रजनगरी मेट भुजबळ सिटी नाशिक येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रितांच्या कविसंमेलनास नाशिककर रसिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. महाराष्ट्रभरातून आलेल्या कवींनी विविध विषयांवर काव्य, गझलच्या माध्यमातून भाष्य केले. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी पूर्णवेळ उपस्थिती लावली. कार्यक्रमाला माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी श्रीधर नांदेडकर होते. सूत्रसंचालन संजय चौधरी यांनी केले. यावेळी कवी दगडू लोमटे, सय्यद अल्लाउद्दीन, रवी कोरडे , प्रिया धारुरकर, वैजनाथ अनमुलवाड, भाग्यश्री केसकर, मीनाक्षी पाटील , वाल्मीक वाघमारे , इरफान शेख , किशोर बळी , दिनकर वानखेड, मनोज सुरेंद्र पाठक, विष्णु सोळंके, गजानन मानकर, संजय कृष्णाजी पाटील, रामदास खरे, प्रवीण बोपुलकर, गीतेश शिंदे, मनोज वराडे, वैभव साटम, गौरी कुलकर्णी, संगीता धायगुडे, विलास गावडे, डॉ . माधवी गोरे मुठाळ, अमोल शिंदे, प्रतिभा जाधव, अजय कांडर, विनायक कुलकर्णी, अविनाश चव्हाण, संजीवकुमार सोनवणे, विजय जोशी, अंजली बवे, प्रशांत केंदळे, दयासागर बन्ने, साहेबराव ठाणगे, प्रकाश होळकर, उत्तम कोळणावकर, संदीप जगताप, मिलिंद गांधी, रेखा भांडारे, विष्णू भगवान थोरे, कमलाकर देसले, राजेंद्र केवळबाई दिये, सुषमा ठाकूर, किरण काशिनाथ, दीपा मिरिंगकर, नीता शहा, लक्ष्मण महाडिक, काशिनाथ वेलदोडे, सुशीला संकलेचा आदींनी कविता सादर केल्या. तरुण कवी वाल्मिक वाघमारे यांनी सादर केलेल्या कवितेने सगळ्यांचा खिळवून ठेवले. त्यांनी आपल्या कवितेनं माडलेलं गुरु-शिष्यातल्या एका अनोख्या मैत्रीनं साऱ्यानं हेलावून सोडंल…

मी तर असा ओबड धोबड
मायेची सावली द्यायची विसरून चाललेला
स्वतःलाच चावत विषाच्या ग्लानीत
करुणेचा मोहर फुटू न शकलेला
मृत्यूच्या भीतीने वाळत जाऊन
हिरवेपणाची जिवंतता दृष्टीआड करत जाणारा
या अशा वेडेपणाच्या मध्यातच गाठलंत
हळूवार मायेने सगळ्या भावनांना
कडेवर घेऊन चालत राहिलात
खोल आतले आवाज ऐकून
काठावर उभे ओ देताना दिसलात
भीतीने घाबरून गेल्यावर
त्वरेने जवळ घेऊन कान फुंकलेत
जगण्यातल्या सगळ्या विफलतेतही
छोट्या छोट्या प्रेमाच्या जागा बघायला डोळ्यात
नवीन चकाकी ओतलीत
आटून गेलेल्या झऱ्यांना
तहानलेली पाखरं दाखवून खळखळतं केलत
वाळूत गेलेलं झाड पुन्हा फुटतं
हा चिवट विश्वास उगवून आणलात
कासाविसीच्या टोकावरून
अलगद उतरवलत
डोंगरासारखं पसरून
आत घेतलंत
जर्जर अनिच्छेत पेरलंत
इच्छेचं पीक
माझ्या अंतर्बाह्य अंधारावर
शुभ्र चांदण्यात सांडल्यात
तुमच्या सुफी प्रार्थना
पूर्ण व्हाव्यात म्हणून
मी उपटिन उपटिन माझ्या ह्रद्यातलं तण

साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त तरुण कवी रवी कोरडे यांच्या ‘मी एक घर बांधलय शहरात’ या कवितेनेही रसिकांना मंत्रमुग्ध केले…

खरंतर ज्या दरवाजातून मी प्रवेश करतो
ते होतं एक झाड
ज्याच्या अंगाखांद्यांवर कितीतरी
चिमुकल्या पंखांचे संसार होते
मी विस्थापित केलंय हिरवं झाड
ह्या भिंतीतल्या विटांमध्ये जी माती आहे
ती तर खरी त्वचा आहे पृथ्वीची
जी खरवडून काढली
आणि कितीतरी हिरवी दृश्य डिलीट करून
हा लालसर रंग आला विटांना
मी विस्थापित केलं मातीला
जी वैशाखात तापली असती आणि
झाली असती जिवंत दरसाल मिरगात
जी वाळू भरली मधोमध
ती तर कितीतरी शंख शिंपल्यांचे
वैभव घेऊन चमकत होती काजव्यांनी प्रमाणे
झुळझुळणार्‍या नदीची पार्श्वभूमी होऊन
मी विस्थापित केले वाळूला आणि
मोडली तिची कणखर होण्याची
हजारो वर्षांची तपश्चर्या
कुठल्यातरी निर्विकार डोंगराला कापलं
आणि हा दगड काढला बाहेर
जो फरशी ची बिछायत होऊन आलाय घरभर
ज्याला चमक आलीये
कितीतरी तुटलेपणाच्या घावातून
आणि झालाय गुळगुळीत
अशा हातांच्या स्पर्शांनी की
ज्यांचे उंबरठे ओबडधोबडच राहिले सर्वकाळ
मी केलंय कायमचं विस्थापित एका दगडाला
ज्यानं एखाद्या जिद्दी पहिलवाना सारखं ठरवलं होतं
काळाला हरवायचं
जो ढगालाही थांबवायचा हात उंचावून
एखाद्या लहान पोरासारखा
ही जमीन जिला गर्भारपणाचे स्वप्न पडले
जिच्या अंगाखांद्यांवर बोरी पिकल्या पिकल्या जांभळी
जीचं रूपांतर झालं एका लेआउट मध्ये
जिथं उभी राहिली घरं
मी विस्थापित केलंय एक शेत
ज्याच्या कणसांवर केली होती राघुनी माया
ज्याने पोसली कितीतरी माणसं
तरारुन आलेल्या हरभऱ्या सारखी
आज एक चिमणी आली अंगणात
हरवलेल्या लहान मुलीसारखी
प्लास्टिकच्या पिशवीला कणीस समजून
मी हरवलाय कितीतरी जणांचा मुक्काम
माझा मुक्काम कायम करण्यासाठी

कवयित्री प्रिया धारूर यांच्या कवितेचेही रसिकांनी जोरदार स्वागत केले…

कवीनं व्हावं इतकं आत्ममग्न
की सगळी नग्नताच आर्त होत जावी
इतकी की
समाजमनाचा
वैश्विक हुंकारच
उद्गार बनून यावा त्याच्या ठायी
लेखणीतून झरत जावं दुःख
न्यायाच्या शब्दांची ग्वाही देणारं
रचावं त्यानी सूक्त
स्वकोशी जाळं
फाटत जाताना
फुटत रहाव्यात अहंकारी ओळी
आपल्याच पेटत्या अक्षरात
पहात राहावी आपल्याच षंढत्वाची होळी
दंभ जळाला की पिळही जळून जाईल इडेपिडेचा
नी घेता येईल
जाणता श्वास
बोधाचा
हे कवे
दिशा आकुंचन पावल्या आहेत
काळोख गडद झाला आहे
तू अधिक अधिक गहन हो
संवेदनेचं आभाळ भाळी लाव
आकळत्या कोवळ्या कवितेची शपथ
तुझाच पसारा मांडायची
वेळ आली आहे
तुझ्या लढण्याचे क्षेत्रही तुला कळले आहे
व्यवस्थेनं अस्वस्थ होऊ घातलेली अशक्त श्वासांची गुदमर संपव
पांघर शुद्धत्व आणि बुद्धत्व
तडफडणाऱ्या भोवतालाची कर सुटका
प्रेयस होऊन लढू नकोस
तुझा प्रवास श्रेयसाचा आहे
आणि तू
समकालाचे भान असणारा
एक कवी आहेस
विसरू नकोस कधीही

कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी श्रीधर नांदेडकर यांनी अरुण कोलटकरचं कासव ही कविता सादर केली आणि कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला…

ज्ञानेश्वरानं भाषेचा दिवा ठेवाल
आणि स्वतःसाठी
भुयारातला चिंरतन अंधार
याच भाषेतून तुकारामाचं विमान उडालं.
तर या नदीच्या पात्रात
स्वतःच्या शिदोरीतली
भाकरी सोडून दिली
डोंगरावरून जाताना
मुठीतले सगळे दाणे ओतले झाडांवर
आठशे वर्षं दिवा विझला नाही
चारशे वर्ष भाकरी संपली नाही
भूक लागल्यावर
रानातल्या राबत्या माणसानं
बुक्कीनं कांदा फोडल्यावर
उडालेला कोंब
सावत्याच्या प्रेमळ आत्मासारखा
समोरच्या निर्मळ झऱ्यात
अलगत वाहत राहिला
माझ्या भाषेतले भिरभिरते मासे कुठायत?
रावे, पारवे अन् चिमण्या कुठायत्?
अंधारलेल्या झाडांमधली किलबिल कुठाय?
ही नदी
दिवा ठेवलेला नदीचा काठ
सांभाळून ठेवता आला नाही पापण्यात
माझे अभागी डोळे कुठायत?
एक दाणा धड टिपता आला नाही
माझी दरिद्री तुटकी चोच कुठाय?
हा अपराध मागे टाकीन
तुटलेला पंख घेऊन
मी या भाषेत फडफडत राहीन
मी कोलटकरच्या भिजक्या वहीवरचं
कासव कवेत घेईन
मला शेवटचा अश्रू सांभाळायचाय्

इतर बातम्याः

Special News| साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नारळीकर यांचे अनकट अन् डोळ्यांत अंजन घालणारे स्फोटक भाषण…!

केंद्राविरोधात राज्याचा शड्डू, मंत्री देसाईंची घोषणा; मराठीच्या अभिजाततेसाठी जनतेच्या न्यायालयात लढा, राष्ट्रपतींकडे याचिका