
वैष्णवी हगवणे या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेमुळे राज्यभरात चांगलीच खळबळ उडाली, वैष्णवीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, दीर सुशील हगवणे, पती शशांक हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना अटक केली आहे. आज त्यांची पोलीस कोठडी संपल्यानं त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टानं हगवणे कुटुंबाच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे, पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांची पोलीस कोठडी एका दिवसानं वाढवण्यात आली आहे, तर सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्या पोलीस कोठडीत 31 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे दोघे फरार झाले होते, पोलिसांनी त्यांना सापळा रचून अटक केली, फरारी असताना त्यांना आश्रय दिल्याचा आरोप राहुल जाधव आणि अमोल जाधव यांच्यावर होता. त्यांना या प्रकरणात आता जामीन मिळाला आहे, पुणे कोर्टानं राहुल जाधव आणि अमोल जाधव यांना जामीन दिला आहे.
हगवणे कुटुंबाच्या वकिलाचा कोर्टात धक्कादायक दावा
आज वैष्णवी हगवणे प्रकरणात हगवणे कुटुंबाची पोलीस कोठडी संपल्यानं त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं, यावेळी झालेल्या सुनावणीदरम्यान हगवणे कुटुंबाच्या वकिलानं वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेत धक्कादायक दावा केला आहे. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते, असा आरोप वकिलांनं केला आहे, तसेच प्लॅस्टिकच्या छडीनं मारहाण झाली, त्याला हत्यार म्हणायचं का? असा सवालही वकिलाने यावेळी उपस्थित केला.
अजूनही एक आरोपी फरार
दरम्यान या प्रकरणातील अजूनही एक आरोपी फरार आहे, फरार असलेल्या निलेश चव्हाण यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे, सुरुवातीला त्याच्या मागावर पोलिसांचे तीन पथक होते, मात्र आता ही संख्या वाढवण्यात आली असून, पोलिसांचे सहा पथकं त्याचा शोध घेत आहेत.