
राज्यातील 29 महापालिकांचे निकाल आले असून भाजपा या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला. जनतेने भाजपाला भरभरून प्रेम दिले. मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे, जळगाव, धुळे, ठाणे, पनवेल यासह काही पालिकांवर भाजपाची एकहाती सत्ता आली. मुंबई महापालिकेच्या निकालाकडे संपूर्ण राज्याच्या नजरा होत्या. एक अटीतटीची लढत या महापालिकेसाठी बघायला मिळाली. रात्री उशिरापर्यंत विजयासाठी मोठी रस्सीखेच बघायला मिळाली. शेवटी भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने 118 जागांवर विजय मिळवत अनेक वर्षांनी महापालिकेवर सत्ता मिळवली. भाजपाचाच महापाैर मुंबई महापालिकेचा होणार हे देखील स्पष्ट झाले. फक्त मुंबईच नाही तर नांदेडही महापालिका अशी आहे जिथे पहिल्यांदाच भाजपाचा महापाैर बसणार आहे. महापालिकांच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी महायुतीची साथ सोडून चक्क काका शरद पवार यांचा हात पकडला. मात्र, अजित पवारांच्या पक्षाला अत्यंत मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळाले.
पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेत 2017 च्या निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळाले होते. अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला भाजपाने मोठी सुरूंग लावली. मात्र, यंदाच्या निवडणुकीमध्ये राज्यातील समीकरणे झटक्यात बदलली आणि अजित पवार थेट भाजपासोबत गेले. शेवटी आगामी महापालिकांच्या निवडणुका कुठे युती म्हणून तर कुठे विरोधात लढण्याचा निर्णय सर्वच राजकीय पक्षांनी घेतला.
अजित पवारांचे राजकीय वलय पिंपरी चिंचवडसह पुण्यात आहे. मात्र, ऐन निवडणुकीत त्यांना धक्का बसला. पिंपरी चिंचवडच्या लढतीकडे राज्याच्या नजरा होत्या. कारण पिंपरी चिंचवडचे आमदार महेश लांडगे आणि अजित पवार यांच्या खतरनाक युद्ध सुरू झाले होते. अजित पवार यांनी ज्या भाषेत टीका केली, त्याच भाषेत महेश लांडगे यांनीही उत्तर दिले. यादरम्यान मुख्यमंत्र्यांनीही महेश लांडगेंची पाठराखण केली.
निकालामध्ये पिंपरी चिंचवडकरांनी अजित पवारांना नाकारले. महेश लांडगे यांनी या निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद लावली आणि भाजपाला मोठा विजय मिळून दिला. या विजयानंतर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, पिंपरी चिंचवडमध्ये जनतेने आम्हाला छप्पर फाड के पाठिंबा दिला, त्यांनी एक प्रकारे अजित पवार यांना डिवचल्याचेही बघायला मिळाले.