एकनाथ खडसे यांना घेरण्यासाठी आता एसआयटीचे जाळे, कोणत्या प्रकरणात SIT नेमली

| Updated on: Mar 01, 2023 | 10:07 AM

मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सातोड प्रकरणात ४०० कोटी रूपयांचा घोळ झाल्याचा आरोप केला होता. त्या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

एकनाथ खडसे यांना घेरण्यासाठी आता एसआयटीचे जाळे, कोणत्या प्रकरणात SIT नेमली
Follow us on

मुंबई : पुर्वाश्रमीचे भाजप नेते व राष्ट्रवादी काँग्रसेचे विद्यामान आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यांसमोरील अडचणी कमी होण्याची चिन्ह नाहीत. उलट त्यांच्यासंदर्भातील अनेक प्रकरणांची चौकशी करुन त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भोसरी प्रकरणातून अद्यापही त्यांची सुटका झाली आहे. त्यानंतर जळगाव दूध संघाच्या प्रकरणात ते अडचणीत आले. आता आणखी एका प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या प्रकरणात ४०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यांवर आहे.

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळात एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड येथील ३३ हेक्टर ४१ आर जमिनीवरून उत्खनन करून ४०० कोटींचा घोटाळा केल्याचा हा आरोप होता. आता या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे.

हे सुद्धा वाचा

 एसआयटी स्थापन

या प्रकरणात एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पत्नी मंदा खडसे यांच्या नावाने सातोड शिवारात ३३ हेक्टर ४१ आर जमिनीची खरेदी करण्यात आली. या जमिनीला शालेय कारणासाठी बिनशेती परवाना म्हणजेच एनए प्रदान करताना अनियमितता झाल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात केला होता. तसेच गौण खनिज प्रकरणात अवैध उत्खनन करत तब्बल ४०० कोटी रुपयांचा महसूल बुडवल्याचा आरोपही करण्यात आला होता. नाशिक विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन केली आहे. विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना खडसे यांच्यांविरोधात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सातोड प्रकरणात ४०० कोटी रूपयांचा घोळ झाल्याचा आरोप केला होता. मुक्ताईनगर तालुक्यात ३३ हेक्टर ४१ आर जमिनीवरून उत्खनन करून हा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. आमदार एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या नावाने सातोड शिवारात ३३ हेक्टर ४१ आर जमिनीची खरेदी केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. या जमिनीला शालेय कारणासाठी बिनशेती परवाना दिल्याचा आरोप त्यांना केला होता.

चंद्रकांत पाटील यांचा नेमका आरोप काय?

“मंदाकिनी खडसे यांच्या नावाने सातोड शिवारात 33 हेक्टर 41 आर जमीन खरेदी करण्यात आली. या जमिनीला शालेय कारणासाठी बिनशेती परवाना दिला. एनए झालेल्या शेतीला पुन्हा कृषक करण्यासाठी जानेवारी 2019 मध्ये अर्ज दिला. तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांनी तात्काळ शेतीसाठी परवानगी दिली. त्यानंतर याच ठिकाणावरुन अवैध गौणखनिज उत्खनन करण्यात आले. या माध्यमातून येथून तब्बल 400 कोटी रुपयांचा घोळ झाला”, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केला होता.

एकनाथ खडसे यांचं स्पष्टीकरण काय?

एकनाथ खडसे यांनी या आरोपांवर आपली भूमिका मांडलीय. “संबंधित जमीन महामार्गाला दिलेली आहे. केंद्र सरकारची सूचना आहे की, राष्ट्रीय महामार्गाला जमीन देत असताना कुठल्याही प्रकारची रॉयल्टी लागतच नाही. खनिकर्म विभागाने चौकशी केली तेव्हा 20 हजार ब्रॉस काढल्याचा अहवाल आहे. त्यामुळे 20 हजार ब्रॉस रॉयल्टी भरली आहे. यामध्ये भ्रष्टाचार कुठे आला? तसेच 4 कोटींची जमीन आणि 400 कोटींचा गैरव्यवहार कसा? हे निव्वळ बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी सभागृहाचा वापर चाललाय हे धोकादायक आहे”, अशी भूमिका एकनाथ खडसे यांनी मांडली.

“एसआयटी चौकशी करा किंवा कोणतीही यंत्रणा बसवा. जे केलेलंच नाही त्याला काय घाबरायचं. जे आहे ते करा, सगळं समोर आहे”, अशी प्रतिक्रिया खडसेंनी दिली होती.