बांग्लादेश इतिहास रचणार! बलाढ्य ऑस्ट्रेलियाकडून फक्त 56 धावांचं आव्हान, दोन दिवसांचा खेळ शिल्लक
ऑस्ट्रेलिया बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यावर बांगलादेशची मजबूत पकड असून विजयाच्या वेशीवर आहे. ऑस्ट्रेलियाकडून अवघ्या 56 धावांचं आव्हान मिळालं आहे

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात मोठी नोंद होणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे. दुबळ्या समजल्या जाणाऱ्या बांगलादेशने ऑस्ट्रेलियात जाऊन जबरदस्त कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत नमवणं काही साधी गोष्ट नाही. बांगलादेशसाठी तर ही अशक्यप्राय गोष्ट समजली जात होती. पण आता बांग्लादेश इतिहास रचण्याच्या वेशीवर उभा आहे. बांगलादेशने पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसापासून मजबूत पकड मिळवली होती. ही पकड चौथ्या दिवसापर्यंत कायम ठेवली. ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात चीतपट केलं. तसेच पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली होती. पण चिवट खेळीसाठी प्रसिद्ध असलेला ऑस्ट्रेलियन संघ दुसर्या डावात कमबॅक करेल असं वाटलं होतं. पण दुसऱ्या डावात बांगलादेशच्या चक्रव्यूहात ऑस्ट्रेलियन संघ अडकला. आता बांग्लादेश समोर विजयासाठी फक्त 56 धावांचं आहे.
नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला होता आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. पण पहिल्याच डावात बांगलादेशने दाणादाण उडवून दिली. ऑस्ट्रेलियाला 198 धावांवर रोखलं. तसेच पहिल्या डावात 426 धावा करून 228 धावांची मजबूत आघाडी घेतली. पहिल्या डावात बांगलादेशने दिलेली आघाडी मोडून काढताना ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडाली. अवघ्या 207 धावांवर 7 गडी तंबूत परतले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया फार काही मोठी आघाडी घेणार नाही हे स्पष्ट झालं होतं. तरी शेपटाच्या तीन फलंदाजांनी झुंज देत धावसंख्या 284 वर पोहोचवली. त्यामुळे बांगलादेशसमोर फक्त 56 धावांचं मिळालं.
दुसऱ्या डावात मेहदी हसन मिराजने जबरदस्त कामगिरी केली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तर हसन महमूदने 3 विकेट काढल्या. तर तस्किन अहमद आणि तैजुल इस्लाम यांच्या खात्यात प्रत्येकी एक विकेट आली. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात कॅमरून ग्रीनने झुंजार खेळी केली. त्याने 201 चेंडूंचा सामना करत 104 धावा केल्या. पण त्याला इतर फलंदाजांची हवी तशी साथ मिळाली नाही. त्यामुळे बलाढ्य ऑस्ट्रेलिया आता पराभवाच्या वेशीवर उभी आहे.
बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली तर त्याची इतिहासात नोंद होणार आहे. कारण बांगलादेशचा ऑस्ट्रेलियाचा भूमीवर हा पहिला कसोटी विजय असणार आहे. यापूर्वी एकदा बांगलादेशमध्ये खेळलेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला नमवलं होतं. त्यामुळे एकंदरीत दुसरा विजय ठरेल.
