भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राज के. पुरोहित यांचे निधन

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राज के. पुरोहित यांचे मुंबईत निधन झाले आहे. मुंबादेवी मतदारसंघाचे पाच वेळा आमदार राहिलेल्या पुरोहित यांनी काल रात्री बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राज के. पुरोहित यांचे निधन
Raj K Purohit
| Updated on: Jan 18, 2026 | 8:18 AM

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी कॅबिनेट मंत्री आणि मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष राज के. पुरोहित यांचे काल रात्री मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे मुंबईतील भाजपचा एक आक्रमक आणि अभ्यासू चेहरा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

सलग पाच वेळा आमदार

राज के. पुरोहित हे मुंबईच्या राजकारणातील एक मोठे नाव होते. त्यांचा मुंबईच्या राजकारणात मोठा दबदबा होता. दक्षिण मुंबईतील मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सलग पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले होते. त्यांनी १९९०, १९९५, १९९९ आणि २००४ अशा सलग निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता. युती सरकारच्या काळात (१९९५-१९९९) त्यांनी कामगार, दुग्धविकास आणि संसदीय कार्य मंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती.

केवळ लोकप्रतिनिधी म्हणूनच नव्हे, तर संघटक म्हणूनही त्यांनी मोलाची भूमिका बजावली. मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षाचा विस्तार केला होता. तसेच मुंबईत भाजप कार्यकर्ते वाढवण्यात मोठे योगदान दिले. पक्षाच्या कठीण काळातही ते निष्ठेने भाजपसोबत राहिले. विशेषतः मुंबईतील राजस्थानी आणि मारवाडी समाजाला भाजपशी जोडण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

राजकीय क्षेत्रातून शोक

राज के. पुरोहित हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि आक्रमक शैलीसाठी ओळखले जात. विधानसभेत जनतेचे प्रश्न मांडताना त्यांचा आवाज नेहमीच बुलंद असायचा. सामान्य कार्यकर्त्यांसाठी ते राजभाई म्हणून परिचयाचे होते. गिरगाव, काळबादेवी आणि मुंबादेवी परिसरातील स्थानिक प्रश्नांवर त्यांची मोठी पकड होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे.

राज के. पुरोहित यांच्या निधनाने पक्षाने एक निष्ठावान नेता आणि मार्गदर्शक गमावला आहे. मुंबईच्या विकासात आणि पक्ष वाढवण्यात त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या पश्चात त्यांचा परिवार आणि मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Follow Us