Iran-Israel-US War: मध्य पूर्वेतील युद्धाचा राज्याला फटका, द्राक्ष, केळी, कांदा उत्पादक होरपळले, अपडेट काय?
Middle East War: इराण-इस्त्रायल-अमेरिका युद्धाचा जगावर मोठा परिणाम झाला आहे. भारतासह महाराष्ट्रातील शेतकरी आणि शेतीमालाला मध्य-पूर्वेतील युद्धाचा फटका बसला आहे. मुंबईतील JNPT मधील कंटेनरविषयी काय आहे अपडेट?

Grape, Banana-Onion Producers: मध्य-पूर्वेतील युद्धाचा जगावर वाईट परिणाम होत आहे. इंधन दरवाढीची नागरिकांना कोण भीती वाटत आहे. कालपासून पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर दुसरीकडे शेतकरी आणि शेतमालाला त्याचा फटका बसल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील JNPT बंदरात अनेक कंटनेर उभे असल्याचा दावा करण्यात येत होता. महाराष्ट्रातून द्राक्ष, केळी आणि कांदा उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत की, लवकरच त्यावर तोडगा निघणार याविषयीची मोठी अपडेट समोर आली आहे.
मध्य-पूर्वेतील युद्धाचा निर्यातीवर परिणाम नाही
अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धचा महाराष्ट्रातील द्राक्ष निर्यातीवर कोणताही परिणाम झालेला नसल्याची माहिती महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ व द्राक्ष निर्यातदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले यांनी दिली. सध्या द्राक्ष निर्यात सुरळीत सुरू असून बाजारभावही समाधानकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आखाती देशांमध्ये प्रामुख्याने डिसेंबर व जानेवारी महिन्यात द्राक्षांची निर्यात मोठ्या प्रमाणावर होते. सध्या त्या देशांमध्ये अत्यल्प प्रमाणात निर्यात सुरू आहे. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या कालावधीत युरोप, युके आणि रशिया या देशांकडे द्राक्ष निर्यातीचा मुख्य हंगाम सुरू असतो. तसेच सुवेझ कालवा मार्ग गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्यामुळे निर्यातीसाठी पर्यायी मार्गांचा वापर केला जात आहे. सध्या आफ्रिका खंडातूनही द्राक्ष निर्यात सुरू असल्याने युद्धाचा निर्यातीवर कोणताही नकारात्मक परिणाम झालेला नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
लवकरच परिस्थितीत सुधारणा
मुंबई येथील जेएनपीटी बंदरावर द्राक्षांचे कंटेनर अडकून सुमारे 200 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याच्या चर्चेबाबत बोलताना भोसले यांनी सांगितले की, बंदरावर कांदा, तांदूळ, केळी व इतर शेतीमालाच्या कंटेनरची गर्दी झाल्याने काही प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र परिस्थिती आता सुरळीत होत असून मोठ्या नुकसानीबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा आकडेवारी संघटनेकडे आलेली नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
सध्या द्राक्षांना चांगला दर मिळत असून युद्धाचा बाजारभावावर अद्याप कोणताही परिणाम दिसून आलेला नाही. गेल्या वर्षी मे महिन्यापासून सहा महिने सतत झालेल्या पावसामुळे सुमारे 70 टक्के द्राक्ष बागांचे नुकसान झाले होते आणि केवळ 30 टक्के उत्पादन बाजारात आले. त्यामुळे यंदा मागील वर्षाच्या तुलनेत द्राक्षांना दुप्पट दर मिळत आहे सध्या थॉमसन द्राक्षांना प्रतिकिलो 150 ते 160 रुपये दर मिळत असून क्रिमसन (कलर) द्राक्षांना 150 ते 170 रुपये बाजारभाव मिळत आहे. तर देशांतर्गत बाजारपेठेत बिगर निर्यातक्षम द्राक्षांना 70 ते 80 रुपये दर मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली.
सांगलीतील द्राक्ष उत्पादक संकटात
इराण-इस्त्रायल युद्धामुळे आखाती देशात निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका सांगली जिल्ह्यातील द्राक्षांना बसला आहे, तब्बल साडेतीनशे कंटेनर द्राक्ष सध्या सांगलीच्या कोल्ड स्टोअरेज मध्ये आहे, तर 700 हुन अधिक कंटेनर इतका द्राक्ष हे बागेत आहेत. त्याच बरोबर मुंबईच्या बंदरात 300 कंटेनर थांबून आहेत, त्यामुळे जवळपास 15 हजार टन इतके द्राक्षे आखाती देशात जाण्यापासून थांबले आहेत, याचा मोठा फटका द्राक्ष बागायतदार शेतकरी आणि व्यापार्यांना बसत आहे.सध्या सांगलीचे कोल्ड स्टोरेज हे हाउसफुल झालेले आहेत त्यामुळे आता द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या समोर द्राक्षांची निर्यात कशी करायची हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.
लातूरमधील व्यापाऱ्यांची आर्थिक कोंडी
लातूर इराण आणि इस्रायलच्या युद्धाचा परिणाम आता बाजारपेठेवर होत आहे. लातूरवरून निर्यात केलेला शेकडो टन माल इराणच्या बंदरात पडून असल्याने व्यापार्यांची आर्थिक कोंडी होताना पहायला मिळते आहे. बंदरातून पुढे माल पाठविण्यात येत नसल्याने निर्यात प्रक्रिया थांबली आहे. लातूरचे व्यापारी श्रीहरी काल्या यांनी पाठवलेला माल इराणच्या बंदरात अडकून पडला आहे.
इराणमधील सफरचंदाच्या भावात 30 टक्क्यांची वाढ
आंतरराष्ट्रीय स्तरावरती फळ व्यापाराच्या आयात निर्याती मोठी आर्थिक उलाढाल होत असते. पुण्यातील मार्केट यार्डमधील व्यापारी सध्या चिंतेत आहेत. अमेरिका इराण युद्धाचा थेट परिणाम भारतातील फळ व्यापारावर झालेला आहे. युद्धामुळे हवाई वाहतूक तसेच सागरी वाहतूक ठप्प असल्याने व्यापाराच आर्थिक गणित कोलमडलेले आहे. राज्यातून निर्यात होणारा तांदूळ, द्राक्ष, केळी, कांदा कंटनेर मध्ये पडुन आहे त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा फटका बसला आहे. त्याचबरोबर आखाती देशातून आयात होणारे ड्रायफूड ,सफरचंद यांच्या दरात मोठी वाढ झालेली आहे
केळी उत्पादकांना मोठा फटका
अमेरिका इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा मोठा परिणाम जळगाव जिल्ह्यातील केळीवर देखील झाला आहे. युद्धामुळे जळगाव जिल्ह्यातले 100 पेक्षा अधिक केळीचे कंटेनर हे जी एन टी पी या ठिकाणी अडकलेले आहेत. रमजान महिन्यांमध्ये तब्बल दररोज 10 ते 12 कंटेनर केळी आखाती देशांमध्ये निर्यात होत असते मात्र युद्धामुळे निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे.
या महिन्यांमध्ये केळीला अडीच हजार रुपयांपर्यंत दर मिळत होता मात्र युद्धामुळे दर घसरले असून केवळ हजार ते पंधराशे रुपयांपर्यंत आता दर मिळत आहे. निर्यात ठप्प झाल्याबरोबरच दुसरीकडे केळीचे दर देखील घसरल्याने केळी उत्पादक शेतकर्याला मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. केळी उत्पादक शेतकर्यांबरोबरच केळीचा व्यापार करणारे व्यापारी देखील निर्यात ठप्प झाल्यामुळे अडचणीत सापडलेले आहेत. केळी नाशवंत फळ असल्याने तोडणीला आलेली केळी किती दिवस सांभाळून ठेवावी अशी मोठी समस्या शेतकर्यांसमोर उभी राहिली आहे.
