गणेश नाईक पुन्हा आक्रमक, माझा राग शांत करायचा असेल तर…, एकनाथ शिंदेंना दिला थेट इशारा, वातावरण तापणार

मंत्री गणेश नाईक हे पुन्हा एकदा चांगलेच आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं, यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना नवी मुंबईतील भूखंडावरून त्यांना इशारा दिला आहे.

गणेश नाईक पुन्हा आक्रमक, माझा राग शांत करायचा असेल तर..., एकनाथ शिंदेंना दिला थेट इशारा, वातावरण तापणार
गणेश नाईक यांचा शिंदेंवर हल्लाबोल
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 13, 2026 | 5:21 PM

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक हे कायम आमने-सामने असतात. गणेश नाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत, तर दुसरीकडे शिंदे देखील आपल्या खास शैलीमध्ये गणेश नाईक यांच्या टीकेचा समाचार घेतात. आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे पुन्हा एकदा गणेश नाईक हे चांगलेच आक्रमक झाले आहेत, त्यांनी नवी मुंबईतील भूखंडावरून थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. त्यामुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे.  नवी मुंबईकरांच्या सुविधेसाठी मी भूखंड मागितले होते, हॉस्पिटल, गार्डन यासाठी आम्ही भूखंडांची मागणी करत आहोत, आणि ते जर मिळत नसतील तर मंत्रिपद काय चाटायचं आहे का? असा सवाल यावेळी गणेश नाईक यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले गणेश नाईक? 

नवी मुंबईकरांच्या सुविधेसाठी मी भूखंड मागितले होते, हॉस्पिटल, गार्डन यासाठी आम्ही भूखंडांची मागणी करत आहोत, आणि ते जर मिळत नसतील तर मंत्रिपद काय चाटायचं आहे का? असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, नवी मुंबईकरांचे सर्व भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचं काम दलालांनी केलं आहे. मला या गोष्टीची लाज वाटते की मी ज्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहे, त्या मंत्रिमंडळाच्या नगरविकास खात्यामधील लोकांकडून असं काम होत आहे. माझा रागा शांत करायचा असेल तर सर्व भूखंड परत करा असा इशाराही यावेळी नाईक यांनी दिला आहे.

नवी मुंबईतील भूखंड प्रश्नांवर गणेश नाईक चांगलेच आक्रमक झाले आहेत.  गप्प राहण्याकरता मी मंत्रिपद स्वीकारलेलं नाहीये, जर जनतेसाठी भूखंड मिळत नसतील तर मंत्रिपद काय चाटायचं आहे का? मला पक्षानं मंत्रिपद दिलं त्यासाठी मी पक्षाचा आभारी आहे. असं गणेश नाईक यांनी यावेळी म्हटलं आहे. दरम्यान येत्या काळात आता हा नव्या मुंबईतील भूखंडांचा मुद्दा अधिकच तापण्याची शक्यता आहे.