पहिला झटका?… भुजबळांची पक्षातच कोंडी? राष्ट्रवादीने हात झटकले

| Updated on: Jan 27, 2024 | 7:44 PM

"सगेसोयरे हे कायद्याच्या कसोटीत अजिबात टिकणार नाही", अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्यांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याच पक्षाच्या दिग्गज नेत्याने त्यांच्या भूमिकेपासून हात झटकले आहेत.

पहिला झटका?... भुजबळांची पक्षातच कोंडी? राष्ट्रवादीने हात झटकले
Follow us on

शाहिद पठाण, Tv9 मराठी, गोंदिया | 27 जानेवारी 2024 : महाराष्ट्र सरकारने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सगेसोयरेबाबतची मागणी मान्य केली आहे. सरकारने नव्या अध्यादेशात सगेसोयरेंबाबतची मागणी मान्य करण्यात आली आहे. पण त्यावर मंत्री छगन भुजबळ नाराज झाले आहेत. त्यांनी या अध्यादेशावर आक्षेप घेतला असून उद्या तज्ज्ञांची बैठक बोलावली आहे. याबाबत उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर “छगन भुजबळ ओबीसींच्या बाबतीत आपली भूमिका समता परिषदेच्या माध्यमातून मांडत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून ते समता परिषदेचे काम करत आहेत. ओबीसींच्या आणि मराठ्यांच्या आरक्षणासंबंधी त्यांची भूमिका ही समता परिषदेच्या माध्यमातून असते. ती भूमिका राष्ट्रवादी पक्षाची नसते”, असं म्हणत प्रफुल्ल पटेलांनी भुजबळांच्या आक्षेपावर हात झटकले.

“माझी प्रत्यक्षात छगन भुजबळ यांच्याशी चर्चा होते तेव्हा त्यांनी कधीही ज्या मराठ्यांकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, त्यांचा कधी विरोध केला नाही. त्याबाबत त्यांची भूमिका ही पॉझिटिव्ह राहिली आहे. कारण कुणबी ही ओबीसी समाजाची जात असल्यामुळे त्याबाबत त्यांनी कधी विरोध केला नाही. मात्र ओबीसींमध्ये ही संख्या वाढत असल्याने ओबीसींच्या बाबतीत काही अधिक करता येईल का, याबाबत सरकार प्रयत्न करणार आहे”, असं स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेल यांनी दिलं.

सगेसोयरेचा अध्यादेश कोर्टात टिकणार नाही? पटेल म्हणाले…

“मराठा समाजाच्या सगेसोयरेचा अध्यादेश ही कोर्टात टिकणार नाही, असा दावा काही जणांकडून केला जातोय. याबाबत प्रफुल्ल पटेल यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपली भूमिका मांडली. “आता कोर्टात काय टिकतं की नाही हे मी भविष्यवाणी करू शकत नाही. पण यापूर्वीही कोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या संबंधित क्युरेटीव्ह दाखल करण्यात आलेली आहे. त्याबाबतीत आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं याबाबत मी आताच भविष्यवाणी करू शकत नाही. माननीय सुप्रीम कोर्ट याबाबतीत योग्य ते निर्णय देईल”, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

“गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील नेत्यांची सुरुवात माझ्यापासूनच होते. मी गोंदिया, भंडारा जिल्ह्यांच्या केंद्रबिंदू आहे. त्यामुळे गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात काही झालं तर त्याची सुरुवात माझ्यापासूनच होईल”, असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं.