Bhagat Singh Koshyari : “भाज्यपाल” राज्यपालांनी पायउतार व्हावं, राष्ट्रवादी नेत्या रुपाली पाटील त्या विधानावर भडकल्या

| Updated on: Jul 30, 2022 | 3:36 PM

राज्यपाल हे भाज्यपाल आहेत. या राज्यपालांनी पायउतार व्हावं, अशी थेट मागणी रूपाली पाटील यांनी केली आहे. तसेच राज्यपालांवरती टीका करताना रूपाली पाटलांचीही जीभ घसरल्याचे दिसून आले.

Bhagat Singh Koshyari : भाज्यपाल राज्यपालांनी पायउतार व्हावं, राष्ट्रवादी नेत्या रुपाली पाटील त्या विधानावर भडकल्या
"भाज्यपाल" राज्यपालांनी पायउतार व्हावं, राष्ट्रवादी नेत्या रुपाली पाटील त्या विधानावर भडकल्या
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : मुंबईतून राजस्थानी आणि गुजराती लोक गेल्यानंतर मुंबईत पैसा उरणार नाही आणि मुंबई देशाची आर्थिक राजधानी उरणार नाही. असे विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केल्यानंतर आता त्या विरोधात संतापची लाट उसळली आहे. राष्ट्रवादीकडून (NCP) राज्यपालांविरोधात राज्यभर आंदोलन सुरू झाली आहेत. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. तसेच आम्ही राज्यपालांच्या विधानाचं समर्थन करत नाही म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आणि भाजपने आधीच हात वरती केलेले आहेत. मात्र आता त्यावर राष्ट्रवादी नेत्या रूपाली पाटील यांनी राज्यपालांची खिल्ली उडवली आहे. राज्यपाल हे भाज्यपाल आहेत. या राज्यपालांनी पायउतार व्हावं, अशी थेट मागणी रूपाली पाटील यांनी केली आहे. तसेच राज्यपालांवरती टीका करताना रूपाली पाटलांचीही जीभ घसरल्याचे दिसून आले.

रुपाली पाटील नेमकं काय म्हणाल्या

राज्यपाल भगतसिंह कौशल यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना रूपाली पाटील म्हणाल्या, राज्यपाल हे भाज्यपाल आहेत. भाजपाल राज्यपालांनी पायउतार व्हावं. त्यांनी मराठी माणसाचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांची माफी नको आता थेट त्यांना पदावरून दूर करावं अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच राज्यपालांच्या या वक्तव्यामागे भाजप आहे, असा आरोपही त्यांनी केली आहे. म्हाताऱ्या राज्यपालांची उच्चलबांगडी करावी म्हणताना रूपाली पाटलांची जीभ घसरल्याचे दिसून आले.

 शिवसेनेचे आमदारही राज्यपालांविरोधात आक्रमक

वादग्रस्त वक्तव्य करत त्यांनी एक प्रकारे महाराष्ट्रातील जनतेचा अवमान केला आहे. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचे हे बेजबाबदारपणाचे वक्तव्य असून, मुंबई हा मराठी माणसाचा आत्मा आहे, आणि राज्यपालांनी मराठी अ मराठी असा वाद निर्माण करू नये, त्यांची आम्ही मुख्यमंत्र्यांमार्फत वरिष्ठांकडे तक्रार करू, अशी प्रतिक्रिया बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी दिलीय.

भाजप नेते म्हणतात आम्ही सहमत नाही

मा. राज्यपाल महोदयांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसाच्या परिश्रमातून, घामातून आणि हौतात्म्यातून उभी राहीली आहे. आमचा तेजस्वी इतिहास पानोपानी हेच सांगतो. त्याला कुणीही कुठल्याही पदावरून नख लावण्याचा प्रयत्न करु नये! भाजपनं आपली भुमिका स्पष्ट केली आहे. राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही, अशा प्रतिक्रिया राज्यपालांच्या विधानावर भाजप नेते आशिष शेलार आणि इतरांनी दिल्या आहेत. त्यामुळे यावरून सध्या जोरदार राजकारण तापलं आहे.