अंबरनाथ : गेले दोन दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबई, ठाण्यासह कोकणाला चांगलेच झोडपून काढले आहे. दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे अंबरनाथ शहरातील रस्ते जलमय (Flooded) झाले आहेत. कलव्हर्ट (Calvert) चॉकअप झाल्याने पाण्याचा निचरा (Drain) होत नाही. यामुळे शहरातील रस्त्यांवर तसेच सखल भागात पाणी साचले आहे. पाऊस असाच सुरु राहिला तर पूरस्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसामुळे झाडे पडणे, वीजेचे खांब कोसळणे अशा घटनाही घडत आहेत. यामुळे मुंबईसह, उपनगरातील काही भागांत वीज पुरवठाही खंडीत करण्यात आला आहे.
अंबरनाथचा बी केबिन रोड हा मोठ्या रहदारीचा रस्ता आहे. नव्यानं वाढणाऱ्या शहराला जोडणारा हा एकमेव रस्ता असून त्यामुळे रिक्षा, खासगी वाहनं, दुचाकी यांची या रस्त्यावर सतत वर्दळ असते. या रस्त्यावर शिवशक्ती नगरकडे वळणावर रस्त्याखालून पाणी वाहून जाण्यासाठी कलव्हर्ट आहे. मात्र हा कलव्हर्ट चॉकअप झालाय. त्यामुळं आज दुपारच्या पाऊस पडताच या पाण्याचा निचरा होऊन शकला नाही. परिणामी बी केबिन रोड या मुख्य रस्त्यावर पाणी साचलं. या पाण्यामुळे त्रास होत असल्याची प्रतिक्रिया इथल्या स्थानिक रिक्षाचालकांनी दिली.
अंबरनाथ शहरातून कल्याण कर्जत राज्य महामार्ग हा मुख्य रस्ता जातो. या महामार्गावर अंबरनाथच्या विमको नाका परिसरात सखल भाग आहे. आज दुपारपासून या भागात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे विमको नाक्याचा परिसर जलमय झाला होता. या साचलेल्या पाण्यातून महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना वाट काढावी लागली. हा राज्य महामार्ग एमएमआरडीएच्या अखत्यारीत असून त्यामुळं आता या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी ठोस उपायोजना करण्याची आवश्यकता आहे.
अंबरनाथ शहरातील वडवली मार्केट परिसरात असलेल्या समाजसेवा सोसायटीत काही वर्षांपूर्वी बी केबिन रोडकडे जाणाऱ्या नाल्यावर कलव्हर्ट बांधण्यात आला. मात्र या कलव्हर्टची उंची ही रस्त्यापेक्षा जास्त झाल्यानं एखाद्या नदीवर बंधारा घातल्याप्रमाणे या रस्त्याची अवस्था झालीय. त्यामुळं थोडासा जरी पाऊस पडला, तरी लगेचच या रस्त्यावर पाणी साचतं आणि हे पाणी थेट इथल्या बंगल्यांमध्ये घुसतं. या त्रासाबाबत अनेकदा इथल्या नागरिकांनी पालिकेकडे तक्रार केली आहे, मात्र त्यावर अद्याप काहीही तोडगा निघालेला नाही. (Heavy rains continue in Ambernath, city roads are flooded)