शिंदे-फडणवीस यांचं टेन्शन वाढवणारी बातमी, शिवसेनेच्या आमदाराचं मोठं वक्तव्य

| Updated on: Jun 24, 2023 | 4:42 PM

राज्यात मंत्रिमंडळ विस्तारावरुन विविध चर्चा सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं टेन्शन वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या आणखी एका आमदाराने मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली आहे.

शिंदे-फडणवीस यांचं टेन्शन वाढवणारी बातमी, शिवसेनेच्या आमदाराचं मोठं वक्तव्य
Follow us on

हिंगोली : महाराष्ट्रात सत्तांतर होऊन आतापर्यंत एक वर्ष होत आलं आहे. पण राज्यात अद्यापही या नव्या सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेक आमदारांना मंत्रिपदाची इच्छा आहे. काहींनी तर कॅमेऱ्यासमोरही जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. पण तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार होताना दिसत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असं म्हटलं जातंय. पण शिंदे-फडणवीस फक्त याबाबतचे वक्तव्य करुन वेळ मारुन नेत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. मंत्रिमंडळ विस्तारावरुन आमदारांमध्ये धुसफूस असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. या आमदारांचा दबाव एकीकडे असताना शिंदे-फडणवीस यांची चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर आलीय.

शिवसेनेच्या हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी मंत्रिपदाची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. विशेष म्हणजे येत्या मंत्रिमंडळ विस्तारात आपण 100 टक्के मंत्रिपदाची शपथ घेणार, असा दावा संतोष बांगर यांनी केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संतोष बांगर हे सातत्याने त्यांच्या विविध वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतात. आता त्यांनी मंत्रिपदाचीच इच्छा व्यक्त केल्याने एकनाथ शिंदे त्यांना खरंच मंत्रिमंडळात संधी देतील का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

संतोष बांगर नेमकं काय म्हणाले?

नांदेडमध्ये उद्या शासन आपल्या दारी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज हिंगोलीच्या शासकीय विश्रामगृहात शिवसेनेची बैठक पार पडली. या बैठकीला मार्गदर्शन करताना आमदार संतोष बांगर यांनी मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली. येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात हा आमदार मंत्रीपद घेतल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, या मराठवाड्याचा नेता आम्हाला मंत्रीपदावर न्यायचा आहे, असं आमदार संतोष बांगर म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मंत्रिपदाची अनेकांना अपेक्षा

राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार नेमका कधी होईल? हा प्रश्न आहेच. पण अनेकांना मंत्रिपदाची इच्छा आहे. अनेक नेते याची आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे या यादीत आता संतोष बांगर यांचं देखील नाव आलं आहे. काही दिवसांपूर्वी आमदार बच्चू कडू यांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी या सरकारच्या कार्यकाळ मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं वाटत नाही, असं म्हटलं होतं. तसेच मंत्रिमंडळ विस्तार करण्याची शिंदे-फडणवीस सरकारमध्ये क्षमता नसल्याची देखील टीका बच्चू कडू यांनी केली होती.