पालघरमध्ये भीषण अपघात, मुख्यध्यापकानं दारूच्या नशेत आठ वाहनांना उडवलं

पालघर जिल्ह्यातल्या वसईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वसईत एका कार चालकानं दारूच्या नशेत भरधाव वेगात येऊन सात ते आठ वाहनांना उडवलं आहे.

पालघरमध्ये भीषण अपघात, मुख्यध्यापकानं दारूच्या नशेत आठ वाहनांना उडवलं
| Updated on: Feb 21, 2025 | 6:38 PM

पालघर जिल्ह्यातल्या वसईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वसईत एका कार चालकानं दारूच्या नशेत भरधाव वेगात येऊन सात ते आठ वाहनांना उडवलं आहे. वसईच्या फादरवाडी सिग्नलवर आज 4 वाजता ही घटना घडली आहे, या अपघातामध्ये एक महिला जखमी झाली आहे, तर इतर वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार  कारचालक हा वसईमध्ये असलेल्या विद्याविकासनी शाळेचा मुख्याध्यापक असल्याचं  स्थानिक नागरिकांनी सांगितले असून, मारिया दासो असे दारूच्या नशेत अपघात करणाऱ्या या मुख्यध्यापकाचं नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. टोयोटा कंपनीची कार हा मुख्याध्यापक चालवत होता, त्याने भरधाव वेगात येऊन सात ते आठ वाहनांना उडवलं. त्याच्या गाडीमध्ये बियरच्या बाटल्या देखील आढळून आल्या आहेत.

वसईच्या फादरवाडी सिग्नलवर या कार चालकाने प्रथम एका रिक्षाचालकाला उडविले, त्यानंतर एका वडापावच्या हातगाडीला उडविले, त्याठिकाणी वडापाव खात असलेल्या महिलेच्या अंगावर गरम तेल पडल्याने ती या घटनेत जखमी झाली आहे. हा कारचालक एवढ्यावरच थांबला नाही तर  त्यानंतर त्याने एकामागून एक आणखी काही वाहनांना धडक दिली.

त्यानंतर  घटनास्थळावरील अन्य काही  वाहनचालकांनी याबाबत वाहतूक पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी वेळीच येऊन या मुख्यध्यापकाला ताब्यात घेतल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. त्याची गाडी देखील ताब्यात घेण्यात आली आहे. मुख्याध्यापक असूनही हा व्यक्ती दारूच्या नशेत गाडी चालवत होता. यामुळे परिसरातून संताप व्यक्त होत होत आहे. पोलिसांनी याविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

जालन्यात बसचा अपघात 

दरम्यान दुसरीकडे जालन्यात देखील बसच ब्रेक फेल होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून, चार जण जखमी झाले आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड बसस्थानकात ही घटना घडली आहे, बस फेल झाल्यानं चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.