IMD Weather Update : देशावर आणखी एक मोठं संकट, 14 राज्यांना आयएमडीचा हाय अलर्ट, महाराष्ट्रालाही मोठा इशारा

महाराष्ट्रासह देशात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे, हवामान विभागाकडून अनेक राज्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

IMD Weather Update : देशावर आणखी एक मोठं संकट, 14 राज्यांना आयएमडीचा हाय अलर्ट, महाराष्ट्रालाही मोठा इशारा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 24, 2025 | 4:52 PM

काही दिवसांपूर्वी देशासह राज्याला पावसानं झोडपून काढलं होतं. पावसानं राज्यात कहर केला, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. दरम्यान आता पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या नव्या अंदाजानं चिंता वाढली आहे. पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, देशासह राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आजपासून ते 29 ऑगस्टपर्यंत अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

काय आहे हवामान विभागाचा नवा अंदाज?

हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील दोन दिवसांमध्ये झारखंड, राजस्थान, ओडिशा आणि बिहार या राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 28 आणि 29 ऑगस्ट रोजी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रासह सिक्कीम राज्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. पंजाब, हरियाणा दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये देखील पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती

दरम्यान कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात देखील पावसाचा जोर वाढणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा राजस्थान आणि पंजाबच्या आसपास सक्रिय असणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा 25 ऑगस्टपासून ते 29 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. महाराष्ट्रात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात या कालावधीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.

17 ऑगस्टपासून ते 21 ऑगस्टपर्यंत राज्यात अतिमुसळधार पाऊस झाला, या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. अनेकांच्या घरात पाणी घुसलं, पुराचा मोठा फटका लोकांना बसला. शेतांमध्ये पाणी साचल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालं असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आल्यानं चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.