स्मार्ट सिटीच्या नावाखाली खड्ड्यांचं शहर केलं, कोणत्या शहराची झाली अशी अवस्था ?

| Updated on: Sep 24, 2022 | 3:23 PM

नाशिकमध्ये शालीमार चौक येथे कॉँग्रेसच्या वतीने स्मार्ट सिटीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आंदोलन केले आहे.

स्मार्ट सिटीच्या नावाखाली खड्ड्यांचं शहर केलं, कोणत्या शहराची झाली अशी अवस्था ?
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची संकल्पना असलेली स्मार्ट सिटी (Smart City) योजना नाशिकमध्ये (Nashik) प्रचंड वादग्रस्त ठरली आहे. कधी शहरात सुरू असलेल्या कामांच्या दर्जावरुन, तर कधी कामांच्या बाबतीत झालेल्या विलंबावरुन टीका झाली. विविध कामांच्या बाबतीत भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप झाला. थेट पालिकेच्या महासभेत सर्वच पक्षांनी यामध्ये नाराजी व्यक्त करत चौकशीची मागणी केली होती. यामध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपने सुद्धा थेट नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेली योजनेला अद्यापही विरोध सुरूच आहे. कॉँग्रेसने याच मुद्द्यावरून आज निदर्शने करत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

नाशिकमध्ये शालीमार चौक येथे कॉँग्रेसच्या वतीने स्मार्ट सिटीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आंदोलन केले आहे.

यावेळी खड्ड्यांचे शहर करणाऱ्या स्मार्ट सिटी कंपनीचे काम बंद करा, नवीन कामे नको अपूर्ण कामे पूर्ण करा असे फलक आंदोलनात लावण्यात आले होते.

याशिवाय स्मार्ट सिटीच्या कंपनीच्या कामांची चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी फलकांच्या माध्यमातून कॉँग्रेसने केली आहे.

नाशिक शहरात स्मार्ट सिटी योजना राबवत असतांना स्मार्ट सिटी कंपनीची स्थापना करण्यात आली होती, त्यातील संचालकांनी देखील स्मार्ट सिटी कंपनीच्या बैठकीत कामांवरून नाराजी व्यक्त केली होती.

नाशिक शहरात स्मार्ट रोड, गोदा प्रकल्प, रामवाडी पुलाजवळ सुरू असलेले गोदावरीचे शुशोभिकरण यांच्या कामावर देखील कॉँग्रेसने अंदोलनादरम्यान प्रश्न उपस्थित केले.

नाशिकच्या अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका या दरम्यान करण्यात आलेल्या स्मार्ट सिटीरोडवरुन तर अक्षरशः व्यावसायिक रस्त्यावर उतरले होते.

स्मार्ट सिटीच्या कामांमुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या व्यावसायिकांचे तब्बल दीड ते दोन वर्ष मोठे आर्थिक नुकसान झाल्याने कंत्राटदाराच्या विरोधात आंदोलन झाले होते.

एकूणच नाशिकमधील स्मार्ट सिटी योजना पहिल्यापासूनच वादीतीत राहिली असून नाशिककर स्मार्ट सिटीच्या योजनेला वैतागले असल्याचे चित्र असल्याने कॉँग्रेसने त्यावरून आंदोलन केले.