पावसाचा हाहाकार! ही 6 जिल्हे संकटात, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा, थेट…

Maharashtra Rain Update : संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढल्याचे बघायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने रेड अलर्टसह ऑरेंज आणि येलो अलर्टही जारी केलाय. यासोबतच अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा, असेही आवाहन नागरिकांना केले जातंय.

पावसाचा हाहाकार! ही 6 जिल्हे संकटात, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा, थेट...
heavy rains
| Updated on: Sep 28, 2025 | 7:53 AM

राज्यामध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. रात्रभर पाऊस सुरू असून सकाळी पावसाचा जोर अधिक वाढलाय. सहा जिल्हांमध्ये प्रशासनाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला. अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळाच, असे प्रशासनाने स्पष्ट म्हटले आहे. मुंबईत ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दुपारनंतर पावसाचा जोर अधिक वाढेल. ​मुंबई, ठाणे, पालघर, जालना आणि रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ​नाशिक आणि पुणे घाट माथ्यावरही मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट आहे. सततच्या पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालीये. अजूनही पावसाचा जोर कमी होण्याचे नाव घेत नाहीये.

राहाता तालुक्याला अतिवृष्टीने झोडपले असून ओढ्या नाल्यांना पूर तर शेती पाण्याखाली गेलीये. शिर्डी परिसरातून जाणारा नगर मनमाड महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. महामार्गाला पाण्याचा वेढा तर ग्रामीण भागातील अनेक रस्ते ठप्प झालीत. शिर्डीतील ओढ्यात रात्री दोनजण वाहून गेली. प्रशासनाच्या सहकार्याने दोघांनाही वाचवण्यात यश मिळाले. शिर्डी शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा फटका बसलाय.

मुंबईसह पुण्यातही आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. पुणे जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात विसर्ग वाढवण्यात आलाय. पहाटे 3 वाजले पासून 10 हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलाय.

जालना जिल्ह्याच्या विविध भागात काल सायंकाळच्या सुमारास आणि मध्यरात्री कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक ठिकाणी गावालगत असलेल्या छोट्या-मोठ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने नागरिकांना प्रवास करावा लागतो. घनसावंगी तालुक्यातल्या शेवगळ या परिसरात पावसाने हजेरी लावल्यामुळे गावालगत असलेल्या पुलावरून पाणी वाहत आहे.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर झाला. 70 वर्षीय सहदेव थोरात आपल्या नऊ बकऱ्यासह नाल्याच्या मध्यभागी अडकले होते. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत सुखरूप वाचवले.पाण्यात उतरून चार तासांच्या प्रयत्नांनंतर थोरात व नऊ बकऱ्यांना बाहेर काढण्यात यश मिळाले.