IMD Weather Alert : पाऊस पुन्हा कोसळणार! 9 जिल्ह्यांवर संकट, थेट विजांच्या कडकडाटासह…

भारतीय हवामान विभागाकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. आज राज्यातील अनेक भागात उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला. मार्च महिन्यातही राज्यात पावसाचे ढग कायम असून अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

IMD Weather Alert : पाऊस पुन्हा कोसळणार! 9 जिल्ह्यांवर संकट, थेट विजांच्या कडकडाटासह...
Heavy rain alert
| Updated on: Mar 11, 2026 | 7:17 AM

राज्यातील हवामानात सातत्याने मोठे बदल होत आहेत. फेब्रुवारी महिन्यात कधी पाऊस, उन्ह तर थंडी अशी स्थिती होती. मार्च महिन्याच्या सुरूवातीपासूनच हवामानात मोठे बदल होताना दिसले. तापमानात मोठी वाढ झाली असून अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 40 च्या पार आहे. राज्यात उकाडा वाढलेला असतानाच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा अंदाज वर्तवला आहे. राज्यात पुढील 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला. उष्णता वाढलेली असतानाच थेट पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील काही तास अवकाळी पाऊस विजांच्या कडकाडाटासह कोसळेल. यासोबतच काही भागात उष्णतेचा अलर्टही देण्यात आला. कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला.

येणाऱ्या शनिवारी लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडाकडाटासह पावसाचा अंदाज आहे. यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये विजांच्या कडकाडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. फक्त शनिवारीच नाही तर येणाऱ्या रविवारी देखील नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांतील काही भागात विजांचा कडकाडटासह पाऊस होईल. यावेळी मोठ्या प्रमाणात वारेही सुटण्याचा अंदाज आहे.

यासोबतच पुणे, नांदेड, बीड, परभणी येथील वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. दुसरीकडे मुंबईसह कोकणात उष्णता आणि दमट वातावरणात वाढ होण्याचा अंदाज आहे. राजस्थानच्या फतेहपूरमध्ये देशातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. फेतेहपूरमध्ये 1.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. गुजरातच्या राजकोट येथे देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. 41.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

मंगळवारी अमरावती, वाशिम, ब्रह्यपुरी, सोलापूर, जळगाव, यवतमाळ येथे 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद निफाड येथे झाली. निफाडमध्ये 12.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. आज भारतीय हवामान विभागाकडून राज्यातील अनेक भागात उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. पालघर, रायगड आणि मुंबई जिल्ह्यांमध्ये दमट आणि आणि उष्ण हवामानाचा येलो अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी शक्यतो महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळावे.

Follow Us