
मागच्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. मार्च महिन्यातही अवकाळी पाऊस काही पिच्छा सोडण्याचे नाव घेत नाही. फेब्रुवारी महिन्यातही जोरदार पाऊस झाला. आता मार्च महिन्यातही अवकाळी पावसाचा मोठा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. एकीकडे कडाक्याचे उन्ह तर दुसरीकडे पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. राज्यातील अनेक शहरांमध्ये पारा 40 च्या आसपास असल्याचे बघायला मिळतंय. उकाडा आणि उष्णता प्रचंड वाढली आहे. यादरम्यानच भारतीय हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा मोठा इशारा देण्यात आला. यासोबतच अवकाळी पाऊसही हजेरी लावण्याची शक्यता आहे. शनिवार आणि रविवार राज्यातील अनेक जिल्ह्यांवर संकट आहे. थेट अवकाळी पावसासह जोरदार वाऱ्याचा मोठा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
राज्यातील तापमानात वाढ होत असतानाच नाशिकचे तापमान मार्च महिन्यातच 38 अंशावर पोहोचले आहे. उन्हाळा सुरू होताच उच्चांकी तापमानाची नोंद झाली. उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरिक हैराण झाले. थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये मार्च महिन्यातच पारा 38 अंशावर गेल्याने यंदा उन्हाळा तीव्र असण्याची शक्यता आहे. दुपारच्या सुमारास काम नसेल तर घराबाहेर न पडण्याचं डॉक्टरांचा सल्ला आहे.
लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर या भागात शनिवारी आणि रविवारी अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. यासोबतच चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. राज्यातील तापमानात वाढ होत असतानाच दुसरीकडे पावसाचाही मोठा इशारा देण्यात आला आहे. आज दिवसभर तापमानात चढउतार राहण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे.
हवामानातील अचानक झालेल्या बदलाचा मोठा फटका धाराशिव जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. तापमानातील चढउतार आणि वातावरणातील बदलामुळे आंब्याला आलेला मोहर पूर्णपणे गळून पडल्याने उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. मोहर नष्ट झाल्याने यंदाच्या हंगामात आंब्याचे उत्पादन घटण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.