आयपीएस अंजना कृष्णा व्हिडीओ कॉल; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर, स्पष्टच बोलले

आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामधील संवादाचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे, यावर आता अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

आयपीएस अंजना कृष्णा व्हिडीओ कॉल; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर, स्पष्टच बोलले
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 05, 2025 | 4:35 PM

आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामधील संवादाचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे, या व्हिडीओमध्ये अजित पवार हे अंजना कृष्णा यांना चांगलंच सुनावत असल्याचं पहायला मिळत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांकडून अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. दरम्यान या व्हिडीओवर आता अजित पवार यांनी आपल भूमिका स्पष्ट करताना प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार? 

‘सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे’ असं ट्विट अजित पवार यांनी केलं आहे.

 

दरम्यान दुसरीकडे आता या प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील उडी घेतली आहे, रोहित पवारांकडून या प्रकरणासंदर्भात मोठा दावा करण्यात आला आहे.  ‘राज्यात शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसाने झालेलं नुकसान असे अनेक प्रश्न आहेत पण त्यावर चर्चा होण्याऐवजी सध्या करमाळा येथील महिला पोलिस अधिकारी आणि मा. अजितदादा यांच्यातील संभाषणाचीच अधिक चर्चा होताना दिसते. वास्तविक अजितदादा सहज बोलले तरी ते रागावले, संतापले असं त्यांना भेटणाऱ्या नवख्या माणसाला वाटतं. पण अजितदादांची कार्यपद्धती, स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणा गेली ३५-४० वर्षे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. करमाळा प्रकरणात संबंधित महिला अधिकाऱ्याचीही कोणतीही चूक नाही. पण अजितदादांच्या फोन कॉलमधील संभाषणाला जाणीवपूर्वक वेगळं वळण देऊन मित्रपक्षांकडूनच टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसतं. आम्ही विरोधात असलो तरी माझा स्वभाव हा कायम खऱ्याला खरं म्हणण्याचा आहे, त्यामुळं आपल्याच मित्रांकडून कसा सापळा रचला जातो, हेही अजितदादांनी यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवं. आम्ही मात्र नको त्या वादात तेल न घालता खऱ्या प्रश्नांकडं सरकारचं लक्ष वेधत राहू,  असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.