Girish Mahajan: आंदोलनाआडून राजकीय पक्ष, गुंडांची मस्ती… गिरीश महाजन यांच्या वक्तव्याने वादाची ठिणगी
Girish Mahajan on CJP Agitation: CJP आंदोलनावरून भाजपच्याच नाही तर NDA च्या गोटातून ना ना आरोप करण्यात आले. आंदोलनात गुंड घुसल्यापासून ते या आंदोलनाला पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळमधून मदत मिळत असल्याचा आरोपही करण्यात आला. आता जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री गिरीश महाजन या आंदोलनावर तोंडसुख घेतले आहे.

CJP आंदोलनाने तरुणाईच नाही तर देश ढवळून निघाला. या आंदोलनाचे फलित सर्वांनीच पाहिले. अजूनही NEET पेपरफुटीवरून संसदेत पडसाद उमटत आहेत. सीजेपीच्या आंदोलनावरून भाजप आणि NDA च्या घटक पक्षांनी आरोपांची राळ उडवून दिली. या आंदोलनामुळे एका केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आहे. या आंदोलनाआड काही जणांनी त्यांची राजकीय पोळी भाजल्याचा आणि गुंडांनी मस्ती केल्याचा आरोप जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी थोड्यावेळापूर्वी माध्यमांशी बोलताना केला.
दगडफेक करणाऱ्यांना सोडू नका
या आंदोलनाच्या पाठीमागे, त्याचा कसा राजकीय फायदा उचलता येईल या हेतूने काही राजकीय पक्ष, काही गुंड हे मस्ती करत होते, हे आपण पाहिलेले आहे. अटक झालेल्यांमध्ये काही शाळेशी आणि कॉलेजशी संबंध नसलेले लोकही पकडलेले आहेत. त्यांचा काय संबंध होता या आंदोलनाशी असा सवाल गिरीश महाजन यांनी विचारला. मला वाटतं, अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
तर जे खरंच विद्यार्थी आहेत. जे प्रामाणिकपणे या लढ्यात उतरले होते. त्यांच्याबाबतीत सरकार विचार करेल, गृहखातं निर्णय घेईल. पण जे केवळ दंगामस्तीच करायला आले होते, दगडफेकच करायला आले होते. वाहनं तोडायला लागलीत. त्यांना सोडण्याची काहीच आवश्यकता नाही, असे मत महाजन यांनी व्यक्त केले.
अलामट्टी धरणाच्या उंची वाढवण्याविषयी काय निर्णय?
अलामट्टी धरणामुळे आपल्याला मोठा फटका बसला आहे. सांगली, कोल्हापूर असेल पाण्याचा फुगवटा, पूराचा धोका आहे. 2014-2019 काळात मंत्री असताना मी तिथे जाऊन आलो. पण माझ्या माहितीनुसार, केंद्र सरकारने अलामट्टी धरणाची उंची वाढवण्याविषयी कोणतीही परवानगी देण्यात आली नाही. उंची वाढवण्याला आपण कायम विरोधच केला आहे. गेल्यावेळीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उंची वाढवण्याविषयी राज्याच्या भावना कळवल्या होत्या, अशी माहिती मंत्री महाजन यांनी दिली.
CET व MPSC पेपरफुटीविरोधात टॉवरवर चढून आंदोलन
महाराष्ट्रातील CET व MPSC परीक्षांमधील कथित पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाच्या निषेधार्थ युवक काँग्रेस मार्फत या यवतमाळ जिल्ह्यातील मांगुल येथे टॉवर चढून आंदोलन करण्यात येत आहे. CET व MPSC पेपर फुटी प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळावी आणि शिक्षणमंत्री दादा भुसे नैतिकता समजून राजीनामा द्यावा राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.