Jalgaon Kirtan Controversy Video : एवढा उर्मटपणा येतो कुठून? PI पाटील बुटासह महाराजाच्या गादीवर गेले, कीर्तन थांबवलं.. वारकरी संप्रदायात संताप!

| Updated on: Apr 29, 2022 | 10:45 AM

महाराष्ट्रात राहून कीर्तनाच्या ठिकाणी काय पद्धत असते, नारदाची गादी काय असते हेही माहिती नसणे एकवेळ समजू शकते. पण धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी चपला-बुटं काढून जाणं ही अगदी साधी पद्धतही पोलिसांना पाळता येऊ नये का, असा सवाल वारकरी संप्रदायाकडून विचारला जात आहे.

Jalgaon Kirtan Controversy Video : एवढा उर्मटपणा येतो कुठून? PI पाटील बुटासह महाराजाच्या गादीवर गेले, कीर्तन थांबवलं.. वारकरी संप्रदायात संताप!
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

जळगावः मंदिर-मशिदीवरील लाऊडस्पीकरवरून (Loud speaker) राज्यात वाद सुरु असताना प्रत्येक शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर (Maharashtra Police) आहे. तीच जबाबदारी पार पाडत असताना जळगावचे पोलीस निरीक्षकांनी रात्री एका ठिकाणी सुरु असलेले कीर्तन (Jalgaon Kirtan) बंद केले. मात्र ही कारवाई करताना आपण कुठे आहोत आणि कोणत्या पद्धतीनं कारवाई केली पाहिजे, याचं कोणतंही भान पोलीस अधिकाऱ्यानं राखलं नाही, असा आरोप वारकरी संप्रदायाकडून केला जात आहे. चाळीसगावात घडलेल्या या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे. जळगावचे पीआय यांनी हा कार्यक्रम बंद करण्यासाठी थेट बुटांसह स्टेजवर एंट्री घेतली. यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असून पीआय पदावरील व्यक्तीला निदान एवढेही भान नसावे का? की वर्दीचा रुबाब दाखवण्यासाठी पोलिसांनी हा प्रकार केला? असा सवाल वारकरी संप्रदायाकडून विचारला जात आहे. पोलीस निरीक्षकांनी  महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा अपमान केला असून त्यांनी माफी मागितलीच पाहिजे, असा सूर वारकरी संप्रदायातून उमटत आहे.

काय घडला प्रकार?

जळगावात चाळीसगावमधल्या सप्तशृंगी मंदिराजवळ रात्रीच्या वेळेला माइक आणि स्पीकर लाऊन कीर्तनाचा कार्यक्रम सुरु होता. यावेळी शहर पोलीस निरीक्षक के. के. पाटील हे त्या भागात गस्तीवर होते. दहा वाजून गेल्यानंतर लाऊडस्पीकर बंद करावे, असा नियम आहे. या नियमानुसार लाऊडस्पीकर बंद करण्यासाठी पीआय पाटील तेथे गेले. कीर्तनासारख्या धार्मिक कार्यक्रमाला मंडपाच्या बाहेरच चपला-बुटं काढून जाण्याची पद्धत असते. मात्र पीआय यांना याचे भान राहिले नाही. त्यांनी मंडपातून थेट मंचापर्यंत धाव घेतली. महाराज कीर्तन करत असताना, त्यांना पीआय येताना दिसले. महाराजांनी हात पोलिसांना हात जोडून नमस्कार केला. मात्र पोलिसांनी थेट मंचावर बुटांसह येत, महाराज ज्या नारदीय गादीवर उभे होते, तेथेच बुटांसह उभे राहून माइक बंद केला. वारकरी संप्रदायात महाराज ज्या गादीवर उभे राहून कीर्तन करतात, त्या गादीला खूप महत्त्व आहे. पीआय अशा प्रकारे त्यावर बूट घालून येतील, याची कल्पनाही वारकऱ्यांना नव्हती. येथील कारवाईलाही वारकऱ्यांचा विरोध नाही, पण पीआय यांनी वापरलेली ही पद्धत अत्यंत संतापदायक आहे, अशी प्रतिक्रिया वारकरी संप्रदायातून उमटत आहे.

नारदाची गादी म्हणजे काय?

महाराष्ट्रात कीर्तनाची पूर्वापार परंपरा आहे. राज्यभरात होणाऱ्या कीर्तनात नारदीय कीर्तन आणि वारकरी कीर्तन असे दोन मुख्य प्रकार आहेत. नारद हे भारतातील आद्य कीर्तनकार असल्याचं मानलं जातं. त्यामुळे कीर्तन ज्या स्थानावर उभे राहून करतात, ते स्थान म्हणजे देवर्षी नारदांची (कीर्तनाची) गादी असे मानले जाते. त्यामुळे कीर्तनाच्या सुरुवातीला विठ्ठलाचे नामस्मरण, राम कृष्णहरीचा गजर झाल्यानंतर एकच व्यक्ती मंचाच्या मधोमध ठेवलेल्या नारदीय गादीवर येऊन कीर्तन करायला सुरुवात करते. संत परंपरेतील आख्यायिकांचा, अनुभवांचा दाखला देत आजच्या समाजाला दिशा देणारा संदेश या गादीवर उभे राहून वारकरी संप्रदायातील महाराज देत असतात. त्यामुळे या गादीलाही खूप महत्त्व आहे. मात्र जळगावच्या पीआय पाटील यांनी या गोष्टीकडे साफ दुर्लक्ष करत तेथेच बुटांसह प्रवेश केला. ही अत्यंत संतापजनक कृती असल्याची प्रतिक्रिया वारकरी संप्रदायातून उमटत आहे.

वारकरी संप्रदायात संतापाची लाट

जळगाव येथे पीआय यांनी केलेल्या या वर्तनामुळे वारकरी संप्रदायात संतापाची लाट उसळली आहे. याबाबत प्रतिक्रिया विचारली असता, ती नारदाची गादी आहे, याची आपल्याला कल्पनाही नाही, असं पीआय पाटील यांनी सांगितलं. महाराष्ट्रात राहून कीर्तनाच्या ठिकाणी काय पद्धत असते, नारदाची गादी काय असते हेही माहिती नसणे एकवेळ समजू शकते. पण धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी चपला-बुटं काढून जाणं ही अगदी साधी पद्धतही पोलिसांना पाळता येऊ नये का, असा सवाल वारकरी संप्रदायाकडून विचारला जात आहे. तुमची कारवाई अगदी योग्य आहे. तुम्ही विनंती करून लाऊडस्पीकर बंद केला असतात, तर त्यासाठीही आमची तयारी होती, मात्र पीआय साहेब, तुमच्या कारवाईची पद्धत ही वारकरी संप्रदायाच्या धार्मिक दुखावणारी आहे. या उर्मटपणाबद्दल तुम्ही माफी मागितलीच पाहिजे, अशी मागणी वारकरी संप्रदायाकडून होत आहे. या मागणीसाठी वारकरी संप्रदाय आता आंदोलनाच्या तयारीत आहे.