‘भाजप शिवसेनेच्या तब्बल 5 मंत्र्यांना हटवणार’, युतीत पहिली ठिणगी पडल्यानंतर महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा मोठा दावा

| Updated on: Jun 10, 2023 | 8:39 PM

खासदार श्रीकांत शिंदे यांनी भर कॅमेऱ्यासमोर संताप व्यक्त केल्यानंतर भाजप आणि शिवसेना युतीतील पहिला मोठा वाद समोर आला आहे. विशेष म्हणजे श्रीकांत शिंदे यांनी राजीनामा देण्यास आपण तयार असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील आणखी एका बड्या नेत्याने मोठा दावा केला आहे.

भाजप शिवसेनेच्या तब्बल 5 मंत्र्यांना हटवणार, युतीत पहिली ठिणगी पडल्यानंतर महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा मोठा दावा
Image Credit source: tv9
Follow us on

जळगाव : कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीवरुन भाजप नेत्यांनी शिवसेनेला सहकार्य करायचं नाही, असा ठरावच मंजूर केला आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्याची बदली होत नाही तोपर्यंत भाजप शिवसेनेला कल्याण लोकसभा मतदारसंघात मदत करणार नाही, असा ठराव भाजप नेत्यांनी केला आहे. भाजप नेत्यांच्या या ठरावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. युतीत खडा टाकण्याचा प्रयत्न करु नये. युतीत बाधा येत असेल तर आपण खासदारकीचा राजीनामा देण्यास तयार असल्याचं श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्रातील भाजपचे पूर्वाश्रमीचे नेते आणि सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी मोठा दावा केला आहे.

भाजप शिवसेनेच्या तब्बल 5 मंत्र्यांना हटवणार आहे. यामध्ये पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचाही समावेश आहे, असा मोठा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. गुलाबराव पाटील यांच्यावर जलजीवन मिशन योजनेत गैरव्यव्हार केल्याचा ठपका आहे, असाही आरोप एकनाथ खडसे यांनी केला. जलजीवन मिशनमधील भ्रष्टाचाराचे रिपोर्ट दिल्लीमध्ये गेले असावेत, असंही खडसे म्हणाले आहेत.

एकनाथ खडसे यांचा नेमका दावा काय?

“भाजप आणि शिवसेनेतील मतभेद बऱ्याच ठिकाणी उघडकीस येत आहेत. भाजपच्या हायकमांडने महाराष्ट्रामधील शिवसेनेचे जे 5 कॅबिनेट मंत्री आहेत त्यांना बाजूला केलं पाहिजे, अशी भूमिका घेतल्याची बातमी समोर येत आहे”, असं खडसे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“मला वाटतं हे पाचही मंत्री निष्क्रिय आहेत, असं भाजपवाल्यांना वाटतंय. एकतर भाजप कार्यकर्त्यांचं हे काम करत नाहीत. त्याचं त्यांच्याशी जमत नाही. त्यामध्ये आपले जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आहेत. त्यांच्यावरही ठपका ठेवलेला दिसतोय”, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला.

“जलजीवन मिशनमध्ये पूर्णपणे कामे झालेले दिसत नाहीयत. बराचसा गैरव्यवहार, भ्रष्टाचार त्यामध्ये झालेला आहे. अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा रिपोर्ट दिल्लीला वरिष्ठांमध्ये गेलेला असल्यामुळे यांना काढा, अशी भाजपच्या वरिष्ठांनी भूमिका घेतलेली दिसतेय”, असं मत एकनाथ खडसे यांनी मांडलं.