Jalna lathi charge | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची Tv9 मराठीला EXCLUSIVE प्रतिक्रिया

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लाठीचार्जच्या घटनेवर पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण लवकरात लवकर लागू करावं, अशी मागणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहनदेखील केलं.

Jalna lathi charge | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची Tv9 मराठीला EXCLUSIVE प्रतिक्रिया
Chetan Patil | Updated on: Sep 01, 2023 | 9:14 PM

जालना | 1 सप्टेंबर 2023 : मराठा आंदोलकांवर आज जालन्यात लाठीचार्ज करण्यात आलं. मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अंतरवली सराटी गावात उपोषण सुरु होतं. गेल्या चार ते पाच दिवसांपासून हे आंदोलन सुरु होतं. मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या उपोषणस्थळी पाच हजार पेक्षा जास्त जणांचा जमाव जमलेला होता. मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे पोलीस मनोज जरांगे यांना रुग्णालयात घेऊन जाणार होते. पोलिसांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण नंतर पोलीस आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची झाली. त्यातून पुढे गोष्ट लाठीचार्जपर्यंत गेली.

या घटनेवर मनोर जरांगे यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. “एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सरकारला हा सर्वात मोठा डाग आहे. माझी माता माऊलीला गावात येवून मोघलाईने मारलं नाही, शिंदे साहेब सर्व मराठ्यांकडून अपेक्षा होत्या. खास मराठ्याचा माणूस आहे, पण तुम्ही आमच्या माता-माऊलींना मारुन गोळीबार करायला लावला”, असं मनोज जरांगे म्हणाले.

‘अहो मला उठताही येत नाही, तरी…’

“अहो मला उठताही येत नाही. तरी माझ्यावर तुम्ही हल्ला करायला लावता. तुमच्या आयुष्यातला हा मोठा डाग आहे. आम्ही काय केलं की आमच्या माता माऊलींना तुम्ही घरात घुसून मारलं? आमच्यावर गोळीबार? आम्ही काय केलं? शांततेत मागणी केली की, आम्हाला आरक्षण द्या. उपोषण केलं. शिंदे साहेब तुम्हाला आणखी एकदा सांगतो, आताच या लोकांना थांबायला सांगतो, नाहीतर हे गावात धिंगाणा घालतील. आमच्या माता माऊलींना धक्का लागू देऊ नका. आम्ही काही केलेलं नाही. आम्हाला आरक्षण पाहिजे, ते मरेपर्यंत मी घेणारच”, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

“आता मला गोळ्या घाला. मला लोटून दिलं. मला उठता येत नाही. माझ्यात शक्ती नाही. ज्या माणसाच्या पोटात पाच दिवसापासून पाण्याचा थेंब नाही तो माणूस उठू शकत नाही. मला उठता येईना, मी बसून राहिलो. मला मीडियासमोर गोळ्या घालूद्या. कर्फ्यू लावला. शिंदे साहेब गावात कर्फ्यू लागलाय, थाबवा. तीन महिने झालं, समिती काम करत नाही. मी टीव्ही 9च्या माध्यमातून सरकारला आवाहन करतो, लाठीचार्ज करु नका. लोकं घाबरायला लागले आहेत. तुम्ही लहान मुलांना मारलं”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us