Maratha Reservation Protest | जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा भीषण लाठीचार्ज, प्रचंड गदारोळ, नेमकं काय घडलं?

Maratha Reservation Protest news in Maharashtra | मराठा समाजाकडून जालन्यातील एका गावात उपोषण सुरु होतं. या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Maratha Reservation Protest | जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा भीषण लाठीचार्ज, प्रचंड गदारोळ, नेमकं काय घडलं?
| Updated on: Sep 01, 2023 | 7:35 PM

जालना | 1 सप्टेंबर 2023 : जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आलाय. मराठा आंदोलकांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु होतं. आंदोलकांनी टाकलेल्या मंडपात पोलीस घुसले. यावेळी पोलिसांनी प्रचंड लाठीचार्ज केला. आंदोलकांकडून दगडफेक झाली, असा आरोप पोलिसांचा आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात संबंधित घटना घडली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी काही सहकाऱ्यांसह उपोषण सुरु केलं होतं. गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे यांचं उपोषण सुरु होतं. आरक्षण थेट जाहीर करावं, अशी त्यांची मागणी होती.

या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली होती. त्यामुळे अनेकांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. पण ते उपोषणावर ठाम होते. या आंदोलनात अनेक गावकरी आणि संघटना सहभागी झाले होते. पण पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे लाठीचार्ज पूर्वी मनोज जरांगे पाटील आणि गावकऱ्यांसोबत पोलिसांची बातचितदेखील झाली होती. आंदोलनस्थळी पाच हजारांचा जमाव जमलेला होता. यावेळी पोलीस आणि गावकरी यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांकडून जोरदार लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी यावेळी हवेत गोळीबार केल्याचा दावा आंदोलकांचा आहे.

धुळे-सोलापूर महामार्गावर वाहनांची जाळपोळ

जालन्यात लाठीचार्जच्या घटनेमुळे मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. मराठा आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर जाळपोळ केली आहे. आंदोलकांनी काही वाहनांना जाळून टाकलं. तसेच महामार्गावर दगडफेक देखील झाली. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सर्व आंदोलकांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, लाठीचार्जमध्ये काही महिला आणि पुरुष पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

शरद पवार यांचा गृहमंत्र्यावर निशाणा

या घटनेवर शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. राज्याच्या गृहमंत्र्यांच्या मनात काही घटकांबद्दल मनामध्ये जी भावना असेल ती भावना पोलिसांच्या कृतीतून व्यक्त होत असते. ते व्यक्त झालेले चित्र आपण जालन्यात पाहिले. त्यामध्ये पोलिसांना काय दोष द्यायचा. याची पूर्ण जबाबदारी राज्य सरकारची, गृह खात्याची जबाबादारी घेणाऱ्यांची आहे, मी याचा तीव्र निषेध करतो. हे थांबवण्यासाठी त्या लोकांना तिथे जाऊन धीर द्यावं लागेल”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.