तुम्ही एक घ्याल, आम्ही चार फोडू; भाजपचा थेट इशारा, मोठा राजकीय भूकंप होणार

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे सेना (शिवसेना) यांच्यात राजकीय तणाव वाढला आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या पक्षांतरामुळे दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत. भाजपच्या इशाऱ्यानंतर शिवसेनेनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे,

तुम्ही एक घ्याल, आम्ही चार फोडू; भाजपचा थेट इशारा, मोठा राजकीय भूकंप होणार
devendra fadnavis eknath shinde
Updated on: Dec 04, 2025 | 1:21 PM

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरु आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. सध्या या दोन्ही पक्षांकडून सुरू असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची इनकमिंग आऊटगोईंग सुरु आहे. यामुळे युतीत कमालीचा तणाव निर्माण झाला आहे.

शिवसेनेला गंभीर इशारा

डोंबिवलीतील शिंदे गटाचे उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर भाजप आणि शिवसेनेत जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. या प्रवेशानंतर भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी शिवसेनेला गंभीर इशारा दिला. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी शिवसेनेला उघडपणे आव्हान दिले आहे. तुम्ही आमचा एक पदाधिकारी किंवा कार्यकर्ता घ्याल, तर आम्ही तुमचे चार पदाधिकारी आणि चार नगरसेवक भाजपमध्ये घेऊ, असा इशारा नंदू परब यांनी दिला. तसेच युती धर्म म्हणून आम्ही संयम पाळत आहोत, हे तुमचे भाग्य समजा. अन्यथा, आम्ही यापेक्षा विचित्र करू शकतो,” असेही त्यांनी ठणकावले आहे.

 रवींद्र चव्हाणांचे आव्हान

भाजपच्या या इशाऱ्यानंतर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांना थेट आव्हान दिले आहे. रवींद्र चव्हाण हे पदाधिकाऱ्यांसह खासदारांच्या विकास कामाची चोरी करणारे आहेत. सुशिक्षित शहरात गुंडगिरी पसरवत आहेत. युतीत आग लावणारे आहेत. विकास म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यांनी जसं पळवून लावले, तसे चव्हाण यांना शिवसैनिक पळवून लावतील,” अशा शब्दात राजेश कदम यांनी रवींद्र चव्हाण यांना धमकी दिली आहे.

एकमेकांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते खेचण्यात मग्न

दरम्यान कल्याण-डोंबिवलीतील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडल्या आहेत, ज्यामुळे महायुतीतील दोन्ही पक्षांमध्ये अविश्वासाचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. याला प्रत्युत्तर म्हणून, काही तासांतच भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. अलीकडेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कल्याण पूर्वेत शिवसेना (शिंदे गट) चे पदाधिकारी विजय जोशी आणि ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका शीतल मंढारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या पक्षात खेचण्यात मग्न असल्याचे दिसत आहे.