कल्याणमध्ये थरार! आरपीएफ जवान बनला देवदूत… ट्रेन-प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकलेल्या वृद्धाला वाचवलं

Kalyan : रेल्वे स्थानकावर घाईगडबडीत चालती ट्रेन पकडणं किती जीवावर बेतू शकतं, याचा प्रत्यय कल्याण रेल्वे स्थानकावर आला आहे. धावती ट्रेन पकडणाऱ्या एका वृद्धाचा जीव थोडक्यात वाचला आहे.

कल्याणमध्ये थरार! आरपीएफ जवान बनला देवदूत... ट्रेन-प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकलेल्या वृद्धाला वाचवलं
Kalyan News
| Updated on: Apr 08, 2026 | 9:05 PM

मुंबई लोकलमधील गर्दी पाहून अनेकांच्या अंगावर काटा येतो. रेल्वे स्थानकावर घाईगडबडीत चालती ट्रेन पकडणं किती जीवावर बेतू शकतं, याचा प्रत्यय कल्याण रेल्वे स्थानकावर आला आहे. 6 एप्रिलच्या रात्री पुणे–सतरागाछी हमसफर एक्सप्रेसमध्ये चढताना एका वृद्ध प्रवाशाचा पाय घसरला आणि तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधल्या फटीत अडकला. मात्र, तिथेच ड्युटीवर तैनात असलेल्या आरपीएफ जवानांनी चित्तथरारक प्रसंगावधान राखत या प्रवाशाचा जीव वाचवला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून जवानांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

कल्याण स्टेशनवर काळजाचा ठोका चुकवणारी घटना

कल्याण रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर 6 एप्रिल रोजी रात्री 9:36 च्या सुमारास काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. ट्रेन क्रमांक 20821 पुणे-सतरागाछी हमसफर एक्सप्रेस स्थानकावरून सुटत असताना, 63 वर्षीय अश्विनी कुमार बर्वे हे प्रवासी धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्याच वेळी त्यांचा ताबा सुटला आणि ते ट्रेन व प्लॅटफॉर्मच्या मधल्या जीवघेण्या फटीत लटकले.

जवानांनी वाचवले वृद्धाचे प्राण

या घटनेवेळी प्लॅटफॉर्मवर तैनात असलेले आरपीएफचे प्रधान आरक्षक गजानन अंभोरे आणि एमएसएफ जवान विशाल जाधव यांनी ही परिस्थिती पाहताच क्षणाचाही विलंब न लावता तिकडे धाव घेतली. आपल्या जीवाची पर्वा न करता दोन्ही जवानांनी प्रवाशाला ओढून सुरक्षितपणे बाहेर काढले. यानंतर आता गजानन अंभोरे आणि विशाल जाधव या दोघांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

प्रवाशांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाकडून आवाहन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारअश्विनी कुमार बर्वे हे छत्तीसगडमधील बिलासपूरचे रहिवासी आहेत. ते चहा पिण्यासाठी खाली उतरले होते, परंतु गाडी सुरू झाल्याने घाईघाईत चढताना त्यांचा पाय घसरला. मृत्यूच्या दारेतून बाहेर काढल्याबद्दल त्यांनी गजानन अंभोरे आणि विशाल जाधव या जवानांचे डोळ्यांत पाणी आणून आभार मानले. तर आरपीएफच्या ऑपरेशन जीवन रक्षा अंतर्गत जवानांनी दाखवलेल्या या साहसाची आणि सतर्कतेची सध्या सर्वत्र चर्चा होत असून, प्रवाशांनी सतर्क राहण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Follow Us