
राज्यात सध्या नाशिकमधील तपोवन येथील वृक्षतोडीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. कुंभमेळ्यासाठी नाशिक येथील तपोवनात असलेले काही वृक्ष तोडण्यात येणार आहेत. मात्र याला पर्यावरणप्रेमी आणि विविध सामाजिक संस्थांकडून जोरदार विरोध होत आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील या मोहिमेला पाठिंबा दिला असून, वृक्षतोडीला विरोध केला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण चांगलंच तापलं आहे, आता या प्रकरणात करुणा मुंडे यांनी देखील एण्ट्री घेतली असून, त्यांनी तपोवनाला भेट दिली आहे. आम्ही या वृक्षतोडीचा तीव्र निषेध करतो. धर्माच्या नावाखाली व्यापार करू नका. साधू–संतांना सिमेंट–काँक्रीटमध्ये बांधून ठेवू नका. तपस्या भंग करू नका. निसर्गाशी खेळलात तर भोग भोगावे लागतील, असं यावेळी करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या करुणा मुंडे?
आज मी तपोवनात आले आहे, झाडे कापण्याचे दुष्कर्म सुरू आहे. संत तुकाराम म्हणायचे
वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, पण देवा भाऊंचे सगेसोयरे अदानी -अंबानी आहेत, पण त्यासाठी वृक्ष कापून मार्ग मोकळा करायचा का? असा टोला यावेळी करुणा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आम्ही या वृक्षतोडीचा तीव्र निषेध करतो, धर्माच्या नावाखाली व्यापार करू नका. साधू–संतांना सिमेंट काँक्रीटमध्ये बांधून ठेवू नका. त्यांची तपस्या भंग करू नका. निसर्गाशी खेळलात तर भोग भोगावे लागतील. शंकराचार्यांनीही सांगितले वृक्ष कापण्याची गरज नाही. एक वृक्ष कापला तर आमचा एक–एक पदाधिकारी आत्मदहन करेल असा इशाराच यावेळी करुणा मुंडे यांनी दिला आहे.
वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, वृक्ष आमचे नातेवाईक. आपले शरीर पाच तत्वांपासून बनले आहे, निसर्गाशी नाते घट्ट आहे. निसर्गाला धक्का लागू नका. राजकारणी लोक राजकारण करतीलच.
हा मुद्दा हिंदू–अहिंदू किंवा धर्माचा नाही, हा निसर्गाचा प्रश्न आहे. त्यासाठी ट्विट करायची गरज नाही, कृती करा. झाडे कापण्याचा प्रयत्न म्हणजे खून करण्याचा प्रयत्न. झाडे कापण्याचे पाप करू नका. नाहीतर आमचा एक एक पदाधिकारी आत्मदहन करेल, असं यावेळी करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे.