Khavdya Donger: ती मध्यरात्री शेतात जायची अन्… कुणालच्या आईबाबत मोठा खुलासा, बहिणीने सांगितलं माहित नसलेलं सत्य
Khavdya Donger: छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगर परिसरातील एक घटना सध्या चांगलीच चर्चेत आहे. चांदगुडे कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूनंतर आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. संगिता चांदगु़डेच्या बहिणीनी कोणालाही माहिती नसलेली अपडेट दिली आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर घडलेली घटना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. चांदगुडे कुटुंबातील तिघांनी या डोंगरावरुन उडी मारून आपले आयुष्य संपवले. मृतांमध्ये १९ वर्षीय कुणाल चांदगुडे, त्यांचे वडील मुरलीधर चांदगुडे (४८) आणि आई संगीता चांदगुडे यांचा समावेश आहे. या घटनेनंतर कुणालच्या आजोळ आणि सासरकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मुरलीधर चांदगुडे यांच्या कुटुंबियांनी कुणालची आई संगिताला पूर्णपणे दोषी ठरवले होते. मात्र आता संगिताची बहीण पल्लवी समोर आली असून तिने सासरच्या माणसांवर गंभीर आरोप केले आहेत. पल्लवीने सांगितले की मुरलीधर आणि संगिताच्या लग्नापासूनच चांदगुडे कुटुंबात संघर्ष सुरू झाला होता. तिने यासंदर्भात अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत.
नेमकं काय घडलं होतं?
संगिता आणि मुरलीधर यांचे लव्ह मॅरेज झाले होते. त्यांना आदित्य नावाचा पहिला मुलगा झाला होता. आदित्य जेव्हा अवघा १४-१५ महिन्यांचा होता तेव्हा संगिता सासरी गेली होती. त्यावेळी सासऱ्यांनी दोघांचे लग्न मान्य नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतर त्यांना शेती मिळाली आणि ते शेती करू लागले. मुरलीधर ड्रायव्हर म्हणून काम करत असताना संगिताने मुलांना पाठीला बांधून सलग चार वर्षे एकटीने शेती केली. तिने तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलांना जपले. मात्र चौदा वर्षांपूर्वी मोठा मुलगा आदित्यचा मृत्यू झाला आणि संपूर्ण चांदगुडे कुटुंबाला मोठा धक्का बसला.
मोठ्या मुलाच्या निधनाने मानसिक धक्का
आदित्यच्या मृत्यूनंतर संगिताला प्रचंड मानसिक धक्का बसला. पोटचा गोळा गेल्याने तिची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. मानसिकदृष्ट्या अस्थिर झालेल्या संगिता रात्री अपरात्री शेतात जाऊन मुलाला शोधायची. आदित्यसाठी तिचा जीव कळवळत होता. या दुःखातून सावरण्यासाठी संगिता आणि मुरलीधर पंधरा दिवसांसाठी संगिताच्या माहेरी आले होते. त्याच काळात संगिताच्या सासऱ्यांनी कोणालाही न विचारता जमिनीचा काही तुकडा मुलींच्या नावावर केला होता. या गोष्टीचे मुरलीधर यांना खूप दुःख झाले होते, असे पल्लवीने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
पल्लवीने आपल्या बहिणीची बाजू मांडताना म्हटले की, जर संगिताला नवऱ्याकडून वीस वर्षे इतका त्रास सहन करावा लागत होता तर तिने काही सेकंदांचाही विचार न करता नवऱ्याच्या आणि मुलाच्या मागोमाग दरीत उडी घेतली नसती. मुरलीधर यांच्या नातेवाइकांना कुणाल आणि संगिता यांच्या मृत्यूचे अजिबात दुःख नव्हते. त्यांना फक्त मुरलीधरच्या जाण्याचे दुःख होते. आमच्यासाठी ही बाब अत्यंत वेदनादायी होती, त्यामुळे आम्ही अंत्यसंस्कारासाठी मृतदेह ताब्यात घेतले, असेही पल्लवीने स्पष्ट केले आहे.