93 च्या भूकंपात अख्ख गाव झालं उद्ध्वस्त, पण या मंदिराची वीटही हलली नाही..
1993 च्या किल्लारी भूकंपाने लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात मोठी हानी केली. या विनाशकारी आपत्तीत हजारो बळी गेले आणि अनेक गावे उद्ध्वस्त झाली. मात्र श्री नीळकंठेश्वर महादेव हे प्राचीन मंदिर भूकंपाचे हादरे सोसूनही आश्चर्यकारकरित्या पूर्णपणे शाबूत राहिले.

Killari Earthquake 1993 : आजपासून सुमारे 32 वर्षांपूर्वीची एक सकाळ. संपूर्ण राज्य गाढ झोपेत असतानाता लातूरच्या किल्लारीत मात्र किंकाळ्या घुमत होत्या. धरणीमाय हलू लागली, घरं, दारं,शाळा, दुकानं, सगळं धडाधडा हलून एक क्षणात धाराशयी पडलं आणि होत्याचं नव्हतं झालं. किल्लारीत आलेल्या त्या भीषण, विनाशकारी भूकंपाच्या आठवणी आजही लोकांच्या मनात आहे, त्या जखमा अजूनही ताज्याच आहेत. त्या भूकंपामुळे अखखं गाव उद्ध्वस्त झाली, घरंस संसार उजाडल, शेकडो बळी गेले आणि उरला तो फक्त धूळ-माती, विटांचा ढिगारा आणि मागे राहिलेल्यांचा गगन भेदून टाकणारा, हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश…
किल्लारी गावात 30 सप्टेंबर 1993 रोजी मोठा भूकंप झाला. या भूकंपाचं केंद्र होतं, सोलापूरच्या ईशान्येला 70 किमी अंतरावरचं किल्लारी गाव. पहाटे 3 वाजून 56 मिनिटांनी अचानक हादरे जाणवले आणक्षणात सगळंच कोसळलं. अनेक लोक गाडले गेले. साखरझोपेतेच काळाने घाला घातला. अनेक घरं मोडकळून पडली, संसार उघड्यावर पडले. मात्र अख्ख्या गावाचं नुकसान झालं तरी तिथे एक वास्तू अशी होती ज्याची वीटही हलली नाही.
लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे १९९३ मध्ये झालेल्या भूकंपाची विनाशकारी घटना महाराष्ट्रातील लोकांच्या मनात अजूनही ताजी आहे. या भूकंपामुळे अनेक गावे उद्ध्वस्त झाली, परंतु धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील बलसूर गावात असलेले श्री नीलकंठेश्वर महादेव मंदिर या विनाशकारी आपत्तीनंतरही मूळ स्थितीत राहिले. जराही ओरखडा उमटला नाही त्यावर..
श्री नीलकंठेश्वर महादेवाला समर्पित हे प्राचीन मंदिर
हे प्राचीन मंदिर ग्रामदैवत श्री नीलकंठेश्वर महादेवाला समर्पित आहे आणि हेमाडपंथी शैलीत बांधलेले आहे, जे पूर्णपणे दगडापासून बनलेले आहे. हजारो वर्षांपूर्वीचं सुंदर कोरीवकाम आणि स्थापत्यकलेमुळे हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिरासमोर एक मोठा दगडी बारवा आहे, जो हेमाडपंथी शैलीत देखील आहे.
श्रावणात होते मोठी गर्दी
श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी आणि विशेषत: शेवटच्या सोमवारी येथे भाविकांची विशेष गर्दी दिसून येतेच. तसेच वर्षभरही या मंदिरात मोठ्या संख्येने लोक दर्शनासाठी येतात. हे मंदिर केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नाही तर त्याची उल्लेखनीय वास्तुकला आणि इतिहास यामुळे त्याचे महत्व खूप वाढतं. 1993 साली आलेल्या विनाशकारी भूकंपात संपूर्ण गाव हादरले, रसातळाला गेलं पण तरीही हे मंदिर मात्र अजूनही शाबूत आहे, जणू काही काळाने त्याला स्पर्श केलेला नाही.