तुम्हीच नाही तर जगून काय करू? त्या ठिकाणी रोज तीन हार अर्पण करायचे… रडायचे, आता तिथेच त्यांनी… त्या घटनेने अख्खं कोल्हापूर हळहळलं
कोल्हापुरातील एका हृदयद्रावक घटनेने शहर हळहळले आहे. पत्नी आणि मुलांनी अपघातात जीव गमावल्यानंतर, विराट गौतम यांनी तीव्र नैराश्यातून जीवन संपवले. ज्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाचा अपघात झाला, त्याच पुईखडी घाटात त्यांनी आत्महत्या केली.

काही लोकं आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतात. त्यांच्याशिवाय जगण्याची कल्पनाही येत नाही. आयुष्याचा एक भाग असलेली ही माणसं अचानक सोडून गेल्यावर जगणं मुश्किल होतं. प्रत्येक दिवस काढणं कठिण होऊन बसतं. आयुष्यात एकाकीपणा येतो आणि त्यातून नैराश्य येतं आणि माणूस नको ते करून बसतो. कोल्हापुरातील घटना अशीच आहे. मनाला चटका लावून जाणारी. एका अपघातात बायको आणि मुलं गेली. त्यातून सावरणं कठिण झालं. अडीच वर्ष एक एक दिवस तो झुरुन झुरुन मरत होता. विमनस्क अवस्थेत जगत होता. अखेर तो काळा दिवस उजाडला. तुमच्याशिवाय जगून काय करू? अशी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आणि ज्या ठिकाणी पत्नी आणि मुलाचा जीव गेला, तिथेच त्याने विष घेऊन स्वत:ला संपवलं. ही घटना कळताच कोल्हापूरकरांच्या काळजात धस्स झालं. प्रत्येक हृदय हळहळलं, प्रत्येक पापण्यांच्या कडा पाणावल्या…
विराट गौतम असं कुटुंब गमावलेल्या व्यक्तीचं नाव आहे. विराट गौतम हे मूळचे पुण्याचे आहेत. काल सकाळी पुईखडी घाटातून प्रवाशांना दुर्गंधी येत होती. त्यामुळे लोकांनी पाहणी केली असता त्यांना एका कोपऱ्यात सडलेल्या अवस्थेत सापडला. त्यामुळे नागरिकांनी करवीर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. मृतदेहा शेजारी एक बॅग आणि मोबाईल सापडला. त्याची तपासणी करण्यात आली आणि मृतदेहाची ओळख पटली.
तिथेच हार अर्पण करायचे…
तीन वर्षापूर्वी विराट गौतम यांच्या पत्नी आणि मुलाचं अपघातात निधन झालं होतं. त्यानंतर ते सावरले नव्हते. नैराश्यातच होते. ते इतके नैराश्यात गेले होते की ज्या ठिकाणी पत्नी आणि मुलांचा अपघात झाला, त्या ठिकाणी ते रोज तीन हार अर्पण करायचे आणि रस्त्याच्या कडेला बसून ढसाढसा रडायचे. त्यातूनच त्यांनी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.
फेसबुकवर पोस्ट…
विराट गौतम यांनी फेसबुकवर पोस्ट करून आत्महत्या केली. मी आज कोल्हापुरात देहत्याग केला आहे. माहीत नाही मी कसं जगतोय. काही लोक जगात असे असतात की त्यांच्याशिवाय जगणं कठिण होतं. असं वाटतं की हे लोक जगातून गेले तर आपण कसं जगणार? माझं जग तेव्हाच उजाडलं, जेव्हा माझ्या काळजाचे तुकडे गेले. निलू, रशिका आणि सर्विलच्याशिवाय मी अडीच वर्ष कसं जगलो हेच मला कळलं नाही, असं विराट गौतमने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तीन वर्षापूर्वी काय घडलं?
तीन वर्षापूर्वी म्हणजे 22 नोव्हेंबर 2023 रोजी विराट गौतम यांच्या कुटुंबाचा अपघात झाला. गोव्याहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसचा राधानगरी मार्गावरील पुईखडी येथील घाटात अपघात झाला होता. वाहनचालकाचं गाडीवरील नियंत्र सुटलं आणि बस उलटली होती. या अपघातात निलू गौतम (वय 43), रिद्धिमा गौतम (वय 17) आणि सार्थक गौतम (वय 13) यांचा मृत्यू झाला होता. विराट गौतम या अपघातातून बचावले होते. आपल्या डोळ्यासमोरच पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याने त्यांना प्रचंड धक्का बसला होता. या मानसिक धक्क्यातून ते सावरले नव्हते. अखेर त्यांनीही तीन वर्षानंतर त्याच ठिकाणी विष घेऊन स्वत:ला संपवलं. या घटनेमुळे कोल्हापूरकर हळहळून गेले आहेत.