‘पोलीस आयुक्त, ईडी अधिकारी घरी आले, म्हणाले, तुम्हाला हात जोडतो, पण…’, शरद पवार यांनी ‘तो’ किस्सा सांगितला

शरद पवार यांना 2019च्या विधानसभा निवडणुकीआधी ईडीकडून नोटीस देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी नेमक्या काय-काय घडामोडी घडल्या होत्या, याबाबत खुद्द शरद पवार यांनी आज कोल्हापुरात आपल्या भाषणात खुलासा केलाय.

पोलीस आयुक्त, ईडी अधिकारी घरी आले, म्हणाले, तुम्हाला हात जोडतो, पण..., शरद पवार यांनी तो किस्सा सांगितला
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 25, 2023 | 9:17 PM

कोल्हापूर | 25 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज कोल्हापुरात जाहीर सभा पार पडली. या सभेत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. भाजपकडून सत्तेचा अतिशय गैरवापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ईडीचा धाक दाखवून विरोधकांना आपल्याकडे वळवण्यात येत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला. विशेष म्हणजे याबाबद्दल बोलत असताना शरद पवार यांनी आपला एक अनुभव शेअर केला. आपल्यालादेखील निवडणुकांआधी ईडीची नोटीस आली होती. पण आपण त्याला कसं सामोरं गेलो आणि ईडी अधिकारी आणि पोलीस आयुक्त आपले कसे पाया पडत होते, याबाबत शरद पवार यांनी माहिती दिली.

“प्रामाणिकपणाने समाजिक कार्य करणाऱ्यांबरोबर अशाप्रकारच्या गोष्टी केल्या जातात. त्याचा परिणाम त्यांना असं वाटतं की, आम्ही त्यांना घाबरून जातो. एकदा निवडणुकीच्या आधी मला ईडीची नोटीस आली. त्यांनी सांगितलं की, ईडीच्या ऑफिसमध्ये तुम्ही या. मी त्यांना सांगितलं की, तुम्ही उद्या या म्हणता, मी आता येतो. मी येतो हे जाहीर केल्यानंतर पोलीस आयुक्त, ईडी अधिकारी घरी आले. तुम्हाला हात जोडतो, पण तुम्ही ईडी कार्यालयात येऊ नका, अशी विनंती केली”, असा दावा शरद पवार यांनी केला.

“मला ज्या कामासाठी ईडीची नोटीस दिली ती एका बँकेच्या व्यवहाराविषयी होती. त्या बँकेचा मी सभासद नव्हतो. त्या बँकेत माझं खातंही नव्हतं. त्या बँकेचं मी कधी कर्ज घेतलं नव्हतं किंवा माझी कोणतीही ठेव नव्हती. काही नसताना भीती घालायची म्हणून ईडीची नोटीस पाठवली. मी येतो म्हटल्यावर तेव्हा कुणीही तयारी ठेवली नाही. तसं धाडस लोकांनीदेखील दाखवलं पाहिजे. आपली बाजू सत्याची असेल तर त्याला चिंता करायचं कारण नाही. देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत घाबरले नाहीत”, असं शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले.

शरद पवार यांचा हसन मुश्रीफ यांना टोला

“आताच आपण बघितलं की, महाराष्ट्रात ईडीच्या नोटीसचा दम काही नेत्यांना दिला. काही लोकांनी तोंड दिलं. पण काही लोकांनी भूमिका बदलली. कोल्हापूर हे शूरांचं गाव आहे. ही नदी आणि या जिल्ह्याचा इतिहास हा शौर्याचा आहे. त्यामुळे इथे ईडीची अशी नोटीस आली तर सामोरं जायची हिंमत दाखवली जाईल, अशी माझी कल्पना होती. पण इथे काहीतरी वेगळंच घडलं”, असं म्हणत शरद पवार यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधायला सुरुवात केली.

“कोल्हापुरात कुणालातरी नोटीस आली. कुणाच्या तरी घरी सीबीआयचे लोकं गेली. कुणाच्या घरी इनकम टॅक्सचे लोक गेले. एकेकाळी आमच्याबरोबर काम केलेले लोकं काहीतरी स्वाभिमान असेल, घरातल्या महिलांनी सांगितलं, ज्याप्रकारे तुम्ही आमच्यावर आरोपांचे हल्ले करता, धाड घालत आहात, यापेक्षा तुम्ही आम्हाला गोळ्या घाला, असं एक बघिणी म्हणू शकते. पण कुटुंबप्रमुखाने असं काही म्हटलेलं मी ऐकलं नाही. ज्या बघिणीने धाडस दाखवलं ते धाडस दाखवण्याऐवजी भाजपसोबत जावू, ते म्हणतील तिथे बसू आणि यातून आपली सुटका करुन घेऊ, अशी भूमिका घेतली”, असा टोला शरद पवारांनी मुश्रीफांना लगावला.