कुंभमेळा विकास कामांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप, CM फडणवीस विरोधकांवर बरसले, म्हणाले…
CM Fadnavis : नाशिकमध्ये कुंभमेळा विकास कामांना वेग आला आहे. अशातच विरोधक या कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत आहेत. याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.

नाशिकमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी नाशिकमधील विकास कामांना वेग आला आहे. सरकार कोट्यवधी रुपये खर्च करून कुंभमेळा योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी विकासकामे करत आहे. अशातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये जाऊन विकास कामांची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना विरोधक या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत असल्याबाबत प्रश्न विचारला होता. यावर फडणवीस यांनी नेमकं काय म्हटले ते जाणून घेऊयात.
सगळी माहिती पब्लिक डोमेनमध्ये…
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कुंभमेळा कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत कामाच्या खर्चाबाबतचा रिपोर्ट जाहीर करा अशी मागणी केली होती. याबाबतच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, सगळ्या प्रोजेक्टबाबत माहिती जाहीर करण्यात आलेली आहे. लपलेला प्रोजेक्ट एकही नाही. सगळी माहिती पब्लिक डोमेनमध्ये आहे, त्यांनी ती माहिती चेक करून घ्यावी. ज्यांच्या मनामध्ये भ्रष्टाचार आहे, ज्यांच्या आचरणामध्ये भ्रष्टाचार आहे, त्यांना इथे रोज येऊन भ्रष्टाचार दाखवायचा आहे.
विरोधक खोटे आरोप करत आहेत…
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘रोज प्रत्येकाने बोलायचं भ्रष्टाचार होतो, जेणेकरून कुंभमेळा बदनाम झाला पाहिजे, ही विरोधकांची एक प्रकारची रणनिती आहे. ज्याप्रमाणे राम मंदिरामध्ये जी काही घटना घडली, त्यानंतर जणू काही सर्व पैसे चोरीला गेले, 1800 कोटींपर्यंत आकडा पोहोचला. आता ही त्यांची स्टॅटर्जी आहे की, ज्या ज्या ठिकाणी सनातन आणि हिंदू आस्था आहे, त्या ठिकाणी अशा पद्धतीने आरोप करत रहायचे, खोटं बोलत रहायचं. लोकांच्या मनात संभ्रम तयार करत रहायचा. पण त्यांनी कितीही संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न केला तरी ये पब्लिक है सब जानती है.’
पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, कुंभमेळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे, कुंभाचे महत्व अध्यात्मिक अभिसरणाचे आहे. भक्ती संगमाची आपण सुरुवात केली आहे. 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण होईल, तारखांनुसार कार्यक्रम होतील. कुंभाची कामे वेगाने चालली आहेत. काही कामांमुळे लोकांना त्रास होतो आहे. संपूर्ण जनतेला अवगत गेले आहे. जनतेची क्षमा मागितली आहे, आमच्यात समन्वयाचा अभाव नाही, महानगर गॅसचे काम उशिरा झाल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र आता समस्या लवकर सुटतील.