
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’ सातवा, जानेवारी महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास शुक्रवारपासून सुरू झाला आहे. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली होती. जुलै महिन्यात घोषणा करण्यात आल्यानंतर राज्यातील 21 ते 60 वयोगटातील सुमारे दोन कोटी महिलांना आत्तापर्यंत दरमहा 1500 रुपये देण्यात आले. तर आता जानेवारीचा हप्ता जमा झाल्यानंतर पात्र महिलांना एकूण 10 हजार 500 रुपये मिळतील.
लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच्या सरकारचे ध्येय आहे. या योजनेमुळे पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 हजार रुपये देण्यात येतात. मात्र आता पात्र लाभार्थींच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. कारण या योजनेसाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांची छाननी करण्यात येत आहे. निकषांत न बसणारे अर्ज योजनेतून वगळण्यात येऊ शकतात. इतर निकषांत न बसणाऱ्या महिलांचेही अर्ज छाननी मध्ये बाद होऊ शकतात अशी चर्चा आहे.
निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याने त्यांनी पैसे परत करण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं. मात्र थोड्याथोडक्या नव्हे तर 30 लाख अपात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची बातमी एका वृत्तपत्रात करण्यात आला होता. अपात्र महिलांना सरकारकडून तब्बल दीड हजार कोटी रुपये मिळाल्याचेही त्यामध्ये म्हटले होते. त्यामुळे मोठी खळबळ माजली होती. 30 लाख अर्ज बाद होण्याचे वृत्तही काही ठिकाणी छापून आलं होतं. मात्र आता या संदर्भात महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण देत या अपप्रचारावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं.
लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात बातम्या चुकीच्या
रायगडमध्ये आज त्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात येणाऱ्या बातम्या चुकीच्या असल्याचं स्पष्ट केलं. 30 लाख अर्ज बाद होण्याच्या मार्गावर असल्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्या म्हणाल्या, ” लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात ज्या काही बातम्या वृत्तपत्रातून येत आहेत त्या सर्व बातम्या चुकीच्या आहेत. हा आकडा कुठून येतो हे माहीत नाही. काही हजारोंच्या संख्येने अर्ज आले आहेत. त्या महिलांनी आवाहनानंतर आपली लाडकी बहीण योजना सोडून दिली आहे. पण अजून आमच्या विभागाने किती महिला अपात्र होणार यासंदर्भात आकडेवारी जाहीर केली नाही आहे. त्यामुळे माध्यमांमध्ये येणाऱ्या सर्व बातम्या या खोट्या आहेत. माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून या बातम्यांवर जनतेने विश्वास ठेवू नये ” असे अदिती तटकरे यांनी नमूद केलं.
2100 रुपये कधी मिळणार ?
विधानसभा निवडणुकीत पुन्हा निवडून आलो तर लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 वरून 2100 करू असे आश्वासन नेत्यांनी दिले होते. मात्र अद्याप लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचा वाढीव हफ्ता मिळालेला नाही. त्यामुळे 2100 रुपयकधी मिळणार असा प्रश्न अनेक महिलांच्या मनात आहे. काही दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात एक महत्वाचं वक्तव्य केलं होतं. मार्च महिन्यानंतरच लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बजेटमध्ये यावर विचार केला जाईल, असे सांगितले. त्यामुळे मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात योजनेत सुधारणा होण्याची शक्यता आहे.