नाशिकमध्ये महायुतीत रस्सीखेच तर सोलापुरात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी; विधान परिषद निवडणुकीत काय घडतंय? काय बिघडतंय?
राज्यात विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. महायुतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. मात्र, यावर महायुतीतील कोणत्याही पक्षाने अधिकृत भूमिका मांडलेली नाही.मात्र, नाशिकमध्ये महायुतीत तर सोलापूरमध्ये महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु आहे.

राज्यात विधान परिषद निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. या निवडणूकांवरुनम महायुतीत नाशिकच्या जागेवरून भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेत रस्सीखेच सुरू झाली आहे. विद्यमान आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा असल्याने ही जागा आम्हीच लढवणार असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. तर नाशिक विभागात सर्वाधिक मतदान भाजपाकडे असल्याने भाजपानेही या जागेवर दावा सांगितला आहे.तर सोलापूरात महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु आहे.
नाशिक विधान परिषद जागेवर विद्यमान आमदार शिंदे यांच्या शिवसेनेचा असल्याने ही जागा त्या पक्षालाच मिळावी,असा दावा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. विद्यमान जागा संबंधित पक्षालाच देण्याबाबत निर्णय झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान कार्यकर्त्यांची मागणी असली तरी निर्णय तिन्ही पक्षांचे प्रमुख घेतील असेही श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे नाशिक विधान परिषदेसाठी एकूण 622 मतांपैकी तब्बल 190 मते भाजपाकडे असल्याने ही जागा भाजपनेच लढवावी, असे भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी म्हटले आहे.
नाशिकच्या जागेवरून भाजप आणि शिंदे सेना आमनेसामने आल्याने महायुतीत चांगलीच रस्सीखेच निर्माण झाली आहे. भाजपकडे 190 तर शिंदे सेनेकडे 171 मते आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 107 मते असल्याने त्यांची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे नाशिक विधान परिषद निवडणूक यंदा रंगतदार होण्याची चिन्हे आहेत..
सोलापूर विधानपरिषदेवरून महाविकास आघाडीत बिघाडी
सोलापूर विधानपरिषदेच्या जागेवरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. सोलापूर विधानपरिषदेची निवडणूक काँग्रेस पक्षाने लढवावी अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे केली आहे. मागीलवेळी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने लढवली त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सोलापुरात महाविकास आघाडीत काँग्रेसची ताकद मोठी आहे.आमच्या खासदार मताधिक्याने निवडून आल्यात, स्थानिक स्वराज्य संस्थेत लक्षणीय संख्या आहे.त्यामुळे निवडणुकीची गणितं पाहता आम्ही इथे निवडून येण्याची शक्यता आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
कालच मी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन उमेदवारी देखील मागितली आहे. निश्चितपणे ते मला उमेदवारी देतील अशी अपेक्षा आहे.सोलापूर विधान परिषदेचा इतिहास आहे की ज्यांची जास्त संख्या असते त्यांची सीट हमखास पडते. त्यामुळे आमचा दावा आहे की आम्ही 100 टक्के निवडून येऊ.यापूर्वी काँग्रेसने ही जागा जिंकली होती त्यामुळे आता आम्ही जी जागा निवडून आणू शकतो. महाविकास आघाडीतील नेते मंडळी ही जागा आम्हाला सोडतील याचा विश्वास आहे. काहीही करुन आम्हाला भाजपला थांबवायचे आहे.आजच्या घडीला 250 लोकं माझ्या संपर्कात आहेत. शिवाय अदृश्य हातही माझ्यापाठीशी आहेत असेही काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी म्हटले आहे.