विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार, 9 उमेदवार रिंगणात, कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी? वाचा संपूर्ण यादी
मोठी बातमी समोर येत आहे, आज विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी या निवडणुकीचं संपूर्ण चित्र स्पष्ट झालं आहे. विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार आहे.

आज विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला होता. विधान परिषदेसाठी 9 जागांचा कोटा होता. त्यापैकी पाच जागा या भाजपच्या वाट्याला आल्या, भाजपच्या पाच उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे, तर शिवसेना शिंदे गटाकडून दोन आणि राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना ठाकरे गटाकडून प्रत्येकी एका उमेदवाराने अर्ज दाखल केल्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. भाजपकडून अतिरिक्त उमेदवार देण्याची शक्यता होती, मात्र भाजपानं अतिरिक्त उमेदवार न दिल्यानं आता या निवडणुकीसाठी 9 चं उमेदवार रिंगणात आहेत.
विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव देखील चर्चेत होतं. जर उद्धव ठाकरे ही निवडणूक लढवणार असतील तर आम्ही उमेदवार देणार नाही, अशी भूमिका भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने घेतली होती. काँग्रेसची देखील तीच भूमिका होती. मात्र ऐनवेळी शिवसेना ठाकरे गटाकडून अंबदास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली, त्यामुळे शिवसेना शिंदे गट, भाजप आणि काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. काँग्रेसने दानवे यांना पाठिंबा दिला तर शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून देखील कोणताही अतिरिक्त उमेदवार देण्यात न आल्यानं आता ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.
भाजपकडून पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, ज्यामध्ये सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार यांच्या नावाचा समावेश आहे. तर प्रज्ञा सातव या विधान परिषदेची पोटनिवडणूक लढवणार आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, ज्यामध्ये नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांच्या नावाचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून झिशान सिद्दिकी आणि शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीत कोणीही अतिरिक्त उमेदवार दिला नसल्यानं ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे.