Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या या जागेवरुन महायुतीमध्ये संघर्षाची चिन्ह, अजितदादांच्या राष्ट्रवादीने ठोकला दावा
Vidhan Parishad Election : जागावाटपावरून महायुतीत अंतर्गत संघर्ष वाढल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी आतापर्यंत 17 अर्जांची विक्री, मात्र एकही अर्ज अद्याप दाखल झालेला नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर 17 सदस्यांची निवड होणार आहे. आमदार म्हणून विधान परिषदेवर जाणारे हे 17 सदस्य कोण असतील? त्यासाठी राजकीय वर्तुळात विविध नावांची चर्चा सुरु आहे. जळगाव, नाशिक, ठाणे-पालघर अशा विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधून हे उमेदवार विधान परिषदेसाठी निवडण्यात येतील. दरम्यान नाशिक विधान परिषदेच्या जागेवरुन महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष होऊ शकतो. कारण नाशिक विधान परिषदेच्या जागेवर आता सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सुद्धा दावा केला आहे. नाशिकच्या जागेवरून महायुतीत तीव्र रस्सीखेच आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची या संदर्भात भेट घेतली.
भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही दावा ठोकला आहे. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत नाशिक जागेचा फैसला होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अॅड. शिवाजी सहाणे यांचं नाव चर्चेत आहे. जागावाटपावरून महायुतीत अंतर्गत संघर्ष वाढल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी आतापर्यंत 17 अर्जांची विक्री, मात्र एकही अर्ज अद्याप दाखल झालेला नाही. 2018 च्या निवडणुकीत नाशिकमधून शिवसेनेचे नरेंद्र दराडे निवडून आले होते.
भाजपची सदस्य संख्या जास्त
सूत्रांच्या माहितीनुसार, विधान परिषदेच्या 17 जागांपैकी भाजप 12 जागांवर, शिंदे गटाची शिवसेना 4 जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेस 1 जागेवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी 25 मे ते 1 जून अर्ज भरण्याची मुदत असून 22 जून रोजी मतदान होईल. महायुती आपसात समन्वय राखून ही निवडणूक लढवणार आहे. पण काही जागांवर मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता नाकारता येत नाही. काही महिन्यांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवलं. त्यामुळे महायुतीची खासकरुन भाजपची सदस्य संख्या जास्त आहे.
शिवसेनेला कुठल्या जागा मिळणार?
ठाणे, नाशिक, यवतमाळ आणि परभणी-हिंगोली या मतदारसंघातील मिळून 4 जागा शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही एक जागा मिळू शकते. भाजपने पुणे मतदारसंघावरील दावा कायम ठेवला आहे. आता नाशिकच्या जागेवरुन तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.