कुणी सिलेंडर देतं का सिलेंडर… जालना-परभणी, नाशिक-नागपूर सगळीकडेच नागरिक हैराण, वाचा तुमच्या जिल्ह्यातील स्थिती

LPG Shortage : मध्यपूर्वेतील युद्धाचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. अनेक शहरांमध्ये गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाल्याचे चित्र आहे. कोणत्या शहरात काय परिस्थिती आहे ते जाणून घेऊयात.

कुणी सिलेंडर देतं का सिलेंडर... जालना-परभणी, नाशिक-नागपूर सगळीकडेच नागरिक हैराण, वाचा तुमच्या जिल्ह्यातील स्थिती
LPG
Image Credit source: Google
| Updated on: Mar 13, 2026 | 7:29 PM

अमेरिका, इस्राईल–इराण या या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. अनेक ठिकाणी गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी गॅस टंचाई निर्माण झाल्यामुळे ऑनलाईन गॅस बुकिंग सेवा बंद पडली असून ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागपूर, वर्धा, परभणी, जालन्यासह राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा लागल्या असल्याचे दिसत आहे. कोणत्या शहरात काय परिस्थिती आहे ते जाणून घेऊयात.

नाशिक

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील एचपी गॅसचे ऑनलाईन बुकिंग बंद करण्यात आले आहे, त्यामुळे अनेकांनी थेट गॅस एजन्सीकडे धाव घेतली आहे. ऑनलाईन बुकिंग सेवा तात्काळ सुरू करावी तसेच आधीच बुकिंग केलेल्या गॅस सिलेंडरचा पुरवठा नेमका कधी होणार याबाबत माहिती मिळावी, अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे. गॅस एजन्सी कार्यालयाबाहेर ग्राहकांची गर्दी होत असल्याचे चित्र सध्या लासलगाव येथे पाहायला मिळत आहे.

परभणी

परभणीत घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला आहे यावर बोलताना जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांनी म्हटले की, ‘परभणीत घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला आहे. कमर्शियल गॅस मिळत नसल्याने घरगुती गॅसचा सर्रास वापर होत आहे. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभाग ऍक्शन मोडवर आहे. अधिकाऱ्यांनी हॉटेलवर धाड टाकत 7 सिलेंडर जप्त केले आहेत. तसेच हॉटेल चालकाला नोटीस बजावली आहे.’

वर्धा

वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात घरगुती सिलेंडरच्या अवैध वापरावर प्रशासनाने कारवाई केली आहे. देवळी तालुक्यातील 10 हॉटेल, टपरी मधून 11 घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले आहेत. तहसीलदार समर्थ क्षीरसागर, पुरवठा अधिकारी चांदनी शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचे समोर आले आहे.

जालना

जालन्यात गॅस एजन्सीच्या बाहेर सकाळपासून नागरिकांच्या रांगा लागल्याचे पहायला मिळत आहे. जालना शहरातल्या मामा चौक परिसरात असणाऱ्या एका गॅस एजन्सीवर सकाळपासूनच सिलेंडर घेण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळालं. कडत उन्हात देखील नागरिक तासनतास रांगेत उभे आहे मात्र बुकिंग करूनही आपल्याला गॅस सिलेंडर मिळेल की नाही याची देखील शाश्वती नाही. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना देखील याचा फटका बसला आहे.

परभणी

आखाती राष्ट्रातील युद्धाचा फटका आता परभणी सारख्या छोट्या शहरांना सुद्धा बसू लागला आहे. परभणीत एलपीजी गॅस पंप धारकांकडून एलपीजी ऑटो चालकांची लूट सुरू आहे. युद्धाचे कारण पुढे करून एलपीजी पंप धारक मनभाव दरवाढ करीत आहेत. गंगाखेड रोड परिसरातील गिरीश नावाच्या गॅस पपंधारकाने 75 रुपयावरून थेट 85 रुपये प्रति लिटरचा दर केला आहे. रातोरात 10 रुपयांची तर आठवडा भरात 28 रुपयांची वाढ केलीये, त्यामुळे ऑटो चालकांनी संताप व्यक्त केला आहे.

बीड

परळीमध्ये देखील गॅस सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांनी येथील HP गॅस च्या एजन्सीवर गर्दी केलेली पाहायला मिळाला आहे. मोबाईल नंबर द्वारे बुकिंग होत नसल्याने ग्राहकांनी थेट एजन्सी गाठल्याचे दिसून आले. गॅस एजन्सीवर होत असलेली गर्दी केवळ बुकिंग होत नसल्याने होत आहे. दरम्यान मोबाईल नंबर वरून बुकिंग ला अडथळा येत असल्यास गॅस ग्राहकांनी सिलेंडर बुकिंग साठी विविध पेमेंट ॲपचा वापर करावा अशा सूचना एजन्सी मार्फत देण्यात आल्या आहेत.

सांगली

युद्धामुळे सांगली जिल्ह्यात व्यवसायिक गॅस सिलेंडरवर मोठा परिणाम झाला आहे, गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने हॉटेल बंद करण्याची वेळ आता सांगलीतील हॉटेल व्यवसायिकांवर आली आहे. सुरळीत गॅस पुरवठा करा, अन्यथा हॉटेल व्यवसाय बंद करावे लागतील,असा इशारा हॉटेल व्यवसायिकांकडून प्रशासनाला देण्यात आला होता. मात्र पुरवठा सुरळित न झाल्यामुळे अनेक हॉटेल्समध्ये संपल्याने हॉटेल बंद करावे लागले आहेत.

लातूर

गॅस तुटवड्याचा फटका शासकीय वस्तीगृहाना देखील बसतो आहे. लातूरमध्ये असलेल्या एक हजार मुलांच्या शासकीय वसतिगृहात गॅस नसल्याने दोन दिवसापासून केवळ डाळ, भात आणि चपाती असे जेवण दिले जाते आहे. गॅस नसल्याने रेग्युलर मेन्यू दिला जात नाही. तसेच या वसतिगृहात स्वयंपाक करण्यासाठी चूल पेटविण्यात आली असल्याचे समोर आले आहे.

अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर

एलपीजी संकटामुळे अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत बोलताना महाराष्ट्र उद्योजक आणि व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी म्हटले की, एलपीजी संकट कायम राहिले तर राज्यातील 10 हजार उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. एलपीजी उद्योगांसाठी लाईफ लाईन आहे, उद्योगांचा एलपीजी सप्लाय बंद केल्याचा आज पाचवा दिवस आहे. उद्योग बंद झाल्यास राज्यात दोन ते अडीच लाख लोक बेरोजगार होतील.कोविड काळात औषधांसाठी जशी उपाययोजना करण्यात आली होती तशी इमर्जन्सी उपाययोजना सरकारने करावी अशी मागणी अग्रवाल यांनी केली आहे.

Follow Us