सावधान! तुमच्या घरी चुना, तेल टाकलेलं दूध येतंय… सरकारमधील आमदाराने प्रात्यक्षिक दाखवत दिला घरचा आहेर, पाहा VIDEO
महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी दुधातील भेसळीचे प्रात्यक्षिक दाखवून तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांनी दुधातील भेसळ कशी होते याचे थेट प्रदर्शन केले आणि शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि भेसळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली.

सध्या महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या पावसाळी अधिवेशनादरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दुधात कशाप्रकारे भेसळ केली जाते, याचे प्रात्यक्षिक दाखवले आहे. शेतकरी दुधात भेसळ करत नाही, सरकारने दुधात भेसळ करणाऱ्यांना कडक शिक्षा करावी, अशी मागणी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
विधानभवनात काय घडलं?
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे विधानभवन परिसरात एक मिक्सर, दूध आणि पाण्याच्या बॉटल, चुना, काही वेगवेगळे केमिकल घेऊन आले. त्यांनी यावेळी हे सर्व मिक्स करुन दुधात कशापद्धतीने दोन प्रकारे भेसळ केली जाते, याबद्दलची माहिती देत थेट प्रात्यक्षिकच दाखवले.
“मुंबई, पुणे यांसारख्या ठिकाणी सर्रास दुधात भेसळ केली जाते. शेतकऱ्यांना दुधाला दर मिळाला पाहिजे, म्हणून ही भेसळ थांबली पाहिजे. यामुळे लोकं मरायला लागली आहे. पुण्यात, मुंबई, नागपुरात राहणारी लोक दिवसभर कष्ट करतात, मेहनत करतात. अनेक लहान मुलांना हे दूध पाजले जाते. सध्या कॅन्सर वाढण्यामागे किंवा रोग वाढण्यामागे कारण काय? तर हे सर्व केमिकल यासाठी जबाबदार आहेत. आमची सरकारला एकच विनंती आहे की तात्काळ त्यांनी या विषयावर काहीतरी निर्णय घ्यावा. यामुळे शेतकऱ्याला दर मिळत नाही आणि इकडे कष्ट करुन दूध खरेदी करणाऱ्याला चांगल्या प्रतीचे दूध मिळत नाही”, असा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.
सदाभाऊ खोत काय म्हणाले?
“राज्यात म्हशीचे दूध ८० ते ९० लाख लीटर तयार होते आणि गायीचे दूध १ कोटी २५ लाख लीटरपर्यंत तयार होते. यातील ७० लाख दूध हे पॅकिंग केले जाते आणि उर्वरित दूध इतर गोष्टींसाठी वापरले जाते. सध्या मोठ्या प्रमाणात भेसळीचे दूध स्वस्त दरात विक्रेत्यांकडे येते. यावर त्यांना कमिशन मिळते. एकीकडे शेतकऱ्याला लुटायचे दुसरीकडे ग्राहकांनाही लुटायचे आणि आमच्या आरोग्याशी खेळायचे असं दूध माफियांचे चाललं ाहे. अशा लोकांना जन्मठेपेपर्यंतची कडक शिक्षा झाली पाहिजे. तरच दूध शेतकरी, सामान्य नागरिक आणि लहान लेकरांचे आरोग्य वाचेल. १०० टक्के भेसळीच्या दुधाचा फायदा कडक केला पाहिजे. फूड ट्रकची तपासणी करणाऱ्यांची संख्या वाढवली पाहिजे. कारण आम्ही शेतकऱ्याची पोर आहोत”, असे सदाभाऊ खोत म्हणाले.
