
महाराष्ट्र विधानसाभ निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ठिकठिकाणी राजकीय नेत्यांच्या सभा होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार आहेत. तर शरद पवार आणि अजित पवार यांची बारामतीत सभा होणार आहे. या सभेत कोण काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. राजधानी दिल्लीत प्रदूषणाचा कहर पाहायला मिळतोय. एअर क्वालिटी इंडेक्स पोचला 400 च्या वर पोहोचला आहे. या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.
महाराष्ट्रात आता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून उमेदवारी अर्ज ते प्रचार अशी रणधुमाळी सुरु होती. अखेर आज त्याची सांगता झाली आहे. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील 288 जागांवर मतदान होणार आहे.
बारामतीत शरद पवारांनी युगेंद्र पवार यांच्यासाठी सभा घेतली. तसेच सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीकास्त्र सोडलं. बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार यांच्यात सामना आहे.
अजित पवारांनी सभेतून बारामतीत दादागिरी चालणार नाही, असं स्पष्ट इशारा दिला आहे. बारामतीत काम करताना मी कधी दंगल होऊ दिली नाही.
नाशिकच्या नामांकित हॉटेलमध्ये आढळलेले पैसे मोजण्याचे काम सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने कारवाई केली. पैसे आढळलेला व्यक्ती राजकीय पक्ष आणि व्यक्तीशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती आहे.
कोरोना काळात ऑक्सिजन मिळत नव्हते. परंतु मी मुख्यमंत्री म्हणून ताकतीने लढलो. त्यावेळी भाजपवाले पंतप्रधान निधीत मदत करत होते. आता मी मुद्दाम येथे आलो आहे. गद्दाराला गाडायचे आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी महेंद्र थोरवे यांना टोला लगावला.
सांगली विधानसभेचे भाजप उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारा निमित्ताने सांगली शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली.आमदार सुधीर गाडगीळ देखील या बाईक रॅलीत सहभागी झाले होते.
चार दिवस राहिले. सुखाने राहा. त्यानंतर विधानभवनाचे दार तुला दिसणार नाही. यापुढे दादागिरी केली तर २३ तारखेनंतर महाविकास आघाडीचे सरकार आणि गद्दार आहे, पाहून घेऊ, काय होईल, असे उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सांगितले.
कर्जत विधानसभा मतदार संघात ठेके खूप दिली गेली. परंतु कामेच झाली नाही. हा पैसा कोणी खाल्ला? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला.
“आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. अनेकांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. आम्ही राजवटीच्या विरोधात लढत आहोत. हे सरकार काँट्रॅक्टरचं सरकार आहे, अदानीचं आहे. धारावीकरांना आम्ही हक्काची घरं देऊ पण अदानी टेंडर रद्द करू,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.
“शिंदेंच्याच नगरविकास खात्यात घोटाळा झाला. अर्धवट कामांवर रंगरंगोटीसाठी 74 कोटी 41 लाख रुपये वापरले. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर घोटाळ्यांची चौकशी करू. बीकेसी मेट्रोचं कामही अर्धवट झालंय, मग रंगरंगोटी कशी केली?,” असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.
नाशकात नामांकित हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपये सापडले. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने कारवाई केली. पाच कोटी रुपयांहून अधिक रक्कम असल्याची माहिती समोर येत आहे. राजकीय पक्षाच्या नेत्यासह गाडी जप्त करण्यात आली.
येवल्यात मंत्री छगन भुजबळांनी प्रचार रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलं. “हे माझं नाहीतर जनतेचं शक्ती प्रदर्शन. ठिकठिकाणी स्वागत करत असल्याने या जनतेच्या प्रेमामुळे निवडणूक मला सोपी जाईल. वीस तारखेला कोणाला न घाबरता, जातीपातीचं राजकारण न करता मतदान करा. पाच वर्षे मी तुमचा सेवक आहे. अर्धा तास वेळ काढून मतदान करा,” असं आवाहन भुजबळ यांनी केलं.
भोर मतदारसंघात शरद पवारांनी सभा घेतली. काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटेंसाठी त्यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर ताशेरे ओढले. “तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून दमदाटी करता का? उपमुख्यमंत्रीपदाचा वापर जनतेची काम करण्यासाठी करा,” असं ते म्हणाले.
महाराष्ट्रातील प्रकल्प इतर राज्यांत गेले, महाराष्ट्र सरकारने उद्योग चोरी केले. अदानींनाच सर्व एअरपोर्ट, धारावी दिली जात आहे – राहुल गांधींचा आरोप.
भाजपच्या एक है तो सेफ है योजनेची राहुल गांधीनी उडवली खिल्ली. पत्रकार परिषदेत राहुल गांधीनी तिजोरी आणली, त्यावर एक है तो सेफ है असं लिहीलं होतं. या तिजोरीच्या आत धारावीचा मॅप आणि एक पोस्टर आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अडाणी यांचं पोस्टर होतं.
आम्ही महिला,शेतकरी आणि कामगार यांच्या संदर्भात काम करत आहोत. जातनिहाय जनगणना आम्ही करणार आहोत. सगळ्यांना समान हक्क हा मिळाला पाहिजे. ५० टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा आम्ही ओलांडणार आहोत – राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मुंबईत पत्रकार परिषद सुरू. आम्ही नेहमी सकारात्मक प्रचार करत आहोत. महाराष्ट्राची निवडणूक ही विचारधारेची निवडणूक आहे. गरीब जनता आणि अरबपती यांच्यात ही निवडणूक सुरू आहे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबईतील वडाळ्याचे उमेदबार स्नेहल जाधव यांच्या कार्यालयाला भेट देणार. प्रचाराचा आजच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरे मुंबईत सभा आणि बाईक रॅलीसाठीही उपस्थित असतील. वडाळ्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून श्रद्धा जाधव तर भाजप कडून कालिदास निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
धुळे शहर विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत होत आहे. यात एमआयएम सह भाजपा आणि ठाकरे गट या तिन्ही पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. धुळे शहरांमध्ये जो व्यक्ती विकास करेल, शहरात रोजगार उपलब्ध करून देईल आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करेल तोच निवडून येईल अशी संमिश्र प्रतिक्रिया मतदारांनी व्यक्त केली आहे.
मुरबाड विधानसभेचे महायुतीचे भाजपचे उमेदवार किसन कथोरे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आज पार पडणार आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बदलापुरात आयोजित गौरी हॉल या ठिकाणी सभेसाठी राहणार उपस्थित राहणार आहेत. मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये दुहेरी लढत पार पडत आहे. शरद पवार गटाचे सुभाष पवार तर दुसरीकडे भाजपचे किसन कथोरे यांच्यामध्ये सामना पाहायला मिळणार आहे.
जळगावात एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला आहे. पहाटे ४ वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या २ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घरावर ३ राऊंड फायर केल्याची माहिती समोर आली आहे. अहमद हुसेन शेख यांच्या घराच्या खिडकीला गोळी लागली.
एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष अहमद हुसेन शेख हे जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. सध्या घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भेट देत पाहणी केली. सध्या गोळीबार करणाऱ्या आरोपींचा तपास सुरू आहे. गोळीबार कोणी व का केला या सर्व कारणांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
बार्शीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या प्रचार रॅलीवर दगडफेक करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार दिलीप सोपल यांच्या समर्थकांनी दगडफेक केल्याचा आरोप शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी केला आहे. ही दगडफेक बनावट असून व्यक्तिगत वादातून हा प्रकार झालेला आहे. या दगडफेकीमध्ये रॅलीतील दोन महिला जखमी झाल्या आहेत.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवार काडादी यांनी जुळे सोलापुरात पदयात्रा काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केले… अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांची महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील आणि भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांच्यात लढत असणार आहे…
भटके विमुक्त समाजाची 150 एकर जागा सोडवून देण्याचे काम भाजप करतेय त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा दिलाय… जोरदार शक्तीप्रदर्शन करत भटके विमुक्त समाजाने भाजप उमेदवारांना पाठिंबा दिला… काँग्रेसने आम्हाला 70 वर्षे केवळ आश्वासन दिले मात्र भाजपने आम्हाला आमच्या हक्काची जागा दिली… या जागेमुळे आम्हाला आमच्या हक्काच्या जमिनी मिळणार आहेत त्यामुळे आम्ही पाठिंबा दिला…. अशी भूमिका समाजाकडून मांडण्यात आली आहे.
वसई विधानसभेचे उमेदवार विजय पाटील आणि नालासोपारा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार संदीप पांडे यांच्या प्रचारार्थ होणार आहे खरगे यांची जाहीर सभा… वसई पश्चिम वाय एम सी मैदानावर आज सकाळी 11 वाजता सभेचं आयोजन केले आहे…
पुणे जिल्ह्यात 90 टक्के टपाली मतदान झालं आहे. दोन हजार २१० मतदारांनी बजावला घरबसल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. विधानसभा निवडणुकीत शहरासह जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांतून ८५ वर्षांपुढील ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांचे घरबसल्या मतदान अंतिम टप्प्यात आले आहे. दोन हजार २७७ मतदारांनी घरबसल्या टपाली मतदानासाठी अर्ज भरून दिला होता.त्यापैकी शनिवारी सायंकाळपर्यंत दोन हजार १४० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ९० टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे देण्यात आली.
काल शरद पवारांची सभा माढ्याच्या टेभुर्णीत पार पडल्यानंतर आज आमदार बबनराव शिंदेची ‘महाविजय सभा’ होत आहे. शरद पवारांनी काल केलेल्या टिकेला आमदार बबनराव शिंदे आज सभेतून उत्तर देणार आहेत. शरद पवारांची सभा झालेल्या ठिकाणीच आज दुपारी २ वाजता आमदार बबनराव शिंदेची महाविजय सभा होणार आहे. आमदार बबनराव शिंदेंकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलमध्ये दाखल झाले आहेत. भारतीयांकडून पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत करण्यात आलं आहे. जी 20 शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी ब्राझीलमध्ये पोहोचले आहेत. भारतीय पद्धतीने पंतप्रधान मोदींचे ब्राझीलमध्ये स्वागत झालं आहे.
राजधानी दिल्लीत प्रदूषणाचा कहर पाहायला मिळतोय. एअर क्वालिटी इंडेक्स पोचला 400 च्या वर पोहोचला आहे. मोठे ट्रक आणि कंटेनर्सना राजधानी दिल्लीत नो एंट्री आहे. आजपासून प्रदूषण नियंत्रणासाठी ग्रेप 4 श्रेणी लागू झाली आहे. बीएस फोर आणि त्या खालच्या डिझेल गाड्यांवर पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे. बांधकाम आणि पाडकामालाही पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. दहावीपर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर झालीय. नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाने आवाहन केलं आहे.