मुंबई : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बारावीचा (12th Result) तर शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल (10th Result) जाहीर होणार आहे. अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली आहे. यंदा कोरोनाच्या दोन वर्षांच्या ब्रेकनंतर पहिल्यांदाच ऑफलाईन परीक्षा पार पडल्या आहेत. त्यामुळे हा निकाल विद्यार्थ्यांसाठी विशेष असणार आहे. लवकरात लवकर निकाल लावण्याचा प्रयत्न राहील अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनाचा विद्यार्थ्यांनाही सर्वात मोठा फटका बसला आहे. अनेक दिवस विद्यार्थी शाळेपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे आता हे नुकसान भरून काढण्याचं तसेच निकाल प्रक्रिया आणि पुढची प्रवेश प्रक्रिया वेगवान बनवण्यावर भर दिला जात आहे.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीचं काम अंतिम टप्प्यात आलंय अशीही माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली त्यामुळे येत्या जूनमध्ये निकाल लागण्याची शक्यता आधीच वर्तविण्यात आली होती, आता त्यावर शिक्कामोर्तब झालंय. अंतिम टप्प्यात 30 तारखेपर्यंत पेपर तपासणीचं काम पुर्ण होणार आहे तसेच जूनच्या दुसऱ्या आठवड्यात बारावी आणि शेवटच्या आठवड्यात 10 वीचा निकाल लागणार आहे, असे आज शिक्षण मंत्र्यांकडूनच स्पष्ट करण्यात आलं आहे. तर निकाल लागल्यानंतर विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी तयारी सुरु होते. निकाल न लागल्याने पुढील प्रवेश अडकतो त्यामुळे बोर्ड सध्या अलर्ट मोडवर आहे. निकालाशिवाय विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशाचं नियोजन करता येत नाही, त्यामुळे ही प्रक्रिया वेगान होऊन निकाल लागणं गरजेचे आहे.
दरम्यान राज्यातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचं संभाव्य वेळापत्रक शालेय शिक्षण विभागानं जाहीर केलयाने त्यामुळे विद्याऱ्यांचा मार्ग आणखी सुकर झाला आहे. विद्यार्थ्यांना 17 मे पासून अर्ज भरता येणार आहे, असे आधीच जाहीर केले आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि अमरावती या पाच विभागांसाठी अकरावी प्रवेश ऑनलाइन पद्धतीने पूर्ण केले जातात त्यासाठी अर्जाची भरण्याची प्रक्रिया ही दोन टप्प्यांत केली जाते. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना नोंदणी करता येते तर त्यानंतर निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अर्जाच्या भाग दोन मध्ये आवडीच्या कॉलेजांचे प्राधान्यक्रम ठरवण्यास वेळ मिळतो. त्यामुळे आजची बातमी विद्यार्थ्यांना आनंद देणारी आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या मनातल्या शंका आता दूर झाल्या आहेत.