जूनच नाही, जुलैही कोरडा जाणार? ऑगस्टमध्ये…? पावसाबाबतची मोठी अपडेट समोर, महाराष्ट्राचं टेन्शन वाढणार?

महाराष्ट्रात यंदा पावसाची गंभीर चिंता आहे. जूननंतर जुलै महिनाही कोरडा जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, ज्यामुळे पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे. एल निनोचा धोका आणि अपुऱ्या पावसामुळे राज्याला अभूतपूर्व दुष्काळाला सामोरे जावे लागू शकते.

जूनच नाही, जुलैही कोरडा जाणार? ऑगस्टमध्ये...? पावसाबाबतची मोठी अपडेट समोर, महाराष्ट्राचं टेन्शन वाढणार?
पावसाबाबतची मोठी अपडेट समोर,
| Updated on: Jun 12, 2026 | 3:11 PM

जूनचा अर्धा महिना होत आला तरी अजून पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यातच उकाडा प्रचंड वाढला आहे. त्यामुळे लोक त्रस्त झाले आहेत. त्यातच यंदा पाऊसमान काही बरं नसणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे अधिकच चिंता वाढली आहे. अल निनोचाही धोका सांगितला जात आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी न भूतो न भविष्यती अशा संकटाला महाराष्ट्राला सामोरे जावे लागणार आहे. मान्सूनबाबतची आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार यंदा जूनच नाही तर जुलै महिनाही कोरडाच जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राला यंदा मोठ्या पाणीबाणीचा सामना करावा लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पावसाबाबतची मोठी माहिती दिली आहे. माणूस अजून निसर्गावर मात करू शकलेला नाही. माणूस रक्त आणि पाणी बनवू शकलेला नाही. माणूस शरीरातील अवयव एकमेकांना देऊ शकतो. मात्र अवयवही स्वतः माणूस बनवू शकलेला नाही. पाऊस पडला तर पाणी मिळणार आहे. जून आणि जुलै कोरडा जाईल असं अंदाज आहे. ऑगस्टमध्ये अतिवृष्टी होईल असंही कळत आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

सरकार म्हणजे परमेश्वर नाही

अतिवृष्टी झाली नाही आणि धरण भरले नाहीत तर पुढच्या वेळेस जानेवारी महिन्यापासूनच पाणी कपात होऊ शकते, असं सांगतानाच सरकार म्हणजे परमेश्वर नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाने चिंता निर्माण झाली आहे. नागरिकांना आतापासूनच पाण्याची बचत करावी लागणार असल्याचे संकेतही या निमित्ताने मिळत आहेत.

मान्सून इलो, मिरग कोरडोच गेलो

दरम्यानस मृग नक्षत्रात कोकणाला पावसाची प्रतिक्षाच आहे. सुपर अल निनोच्या प्रभावामुळे 15 जूनपासून मान्सून सक्रीय होणार आहे. कोकणात सध्या पावसाचा लंपडाव सुरू आहे. मान्सून सक्रिय होऊन काही दिवस उलटले आहेत. मात्र, म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. कडक ऊन, ढगाळ हवामान आणि असह्य उकाड्यामुळे कोकणवासीय हैराण झाले आहेत. जून महिन्यात कोकण किनारपट्टी भागात हवेतील आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे कोकणी माणूस घामाघूम झालेला पाहायला मिळत आहे. उकाड्यातून सुटकेसाठी प्रत्येकाला आता दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. मान्सून इलो पण मिरग कोरडेच गेलो, अशी प्रतिक्रिया कोकणी माणूस व्यक्त करत आहे.

तळकोकणात मान्सूनचा वेग मंदावला

दरम्यान, केरळ ते तळकोकण असा वेगवान प्रवास करणाऱ्या मान्सूनचा वेग सध्या कमालीचा मंदावलेला पाहायला मिळतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नदी, नाले कोरडे पडलेले स्थितीमध्ये पाहायला मिळत आहेत. अपेक्षित प्रमाणे मान्सून हा तळ कोकणामध्ये दाखल होणं गरजेचं होतं, मात्र मान्सूनचा वेग मात्र तळ कोकणामध्ये मंदावलेला पाहायला मिळतोय. कोकणातील बळीराजा हा आकाशाकडे नजरा लागून राहिलेला पाहायला मिळत आहे. काही प्रमाणावरती कोकणात भात पेरणी झालीये तर काही प्रमाणावर भात पेरणी थांबलेली पाहायला मिळत आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us