CM फडणवीसांकडून ईडीचा डाव, मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप, म्हणाले, माझ्या जवळच्या…
CM फडणवीसांकडून ईडीचा डाव टाकल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. आता माझ्या जवळच्या लोकांना ईडी नोटीस पाठवल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत जाऊन उपोषण करणार असल्याचे जाहीर केले. जरांगे पाटील हे येत्या 15 सप्टेंबरपासून मुंबईच्या दौऱ्यासाठी सुरुवात करणार आहेत. या दौऱ्यानंतर पाच दिवसांत मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक मुंबईत पोहोचणार आहेत. परंतु मराठा आंदोलन बंद पाडण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत. माझ्या जवळच्या लोकांना ईडीच्या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘ मुख्यमंत्री फडणवीस मध्यात पडत नाही. पण फडणवीसांना थोडा थोडा नाद आहे. आता संशय येत आहे. माझ्या आजूबाजूच्या जवळच्या लोकांना ईडीच्या नोटीस द्यायला लावत आहेत. ईडीला एक दर्जा आहे. अंतरवाली सराटीतील लोकांच्या ईडीची नोटीस पाठवली, तर ईडीची इज्जत काय राहिली? देशातील टपोरे सोडून अंतरवालीत येतायेत. इकडे अंतरवालीत लोकांना घरात फरशी टाकायला येत नाही. त्या इडीला किंमत राहील का? मी काय करतो, जेवढ्यांना नोटीस पाठवले, त्यांना ट्रकमध्ये भरतो आणि ईडीच्या कार्यालयात नेऊन सोडतो. माझ्या सोबत काम करतात म्हणून हाताला धरायचं. आंदोलनात काम करू नये म्हणून ईडीची नोटीस पाठवायची. एक-दोन असेल, तर ठीक आहे. पण सर्वांना… म्हणजे आंदोलन बंद पडले पाहिजे, असा त्यांचा डाव आहे.
‘मला साथ देणार्यांना गार करायचे. आंदोलन बंद पाडण्यासाठी सर्व सुरू आहे. तुम्हाला त्यांच्या पाठिशी उभं राहायचं आहे. त्यांनी आज पद सोडले. ते जेलमध्येही जायला तयार आहे. आमच्याकडे पूर्ण हिशोब आहे. हे सर्व अर्धवट बुद्धीचे आहेत. महाराष्ट्राने पाहिले आहे. यांनी किती तरी नेते जेलमध्ये टाकले. यांच्यासोबत काम केल्यानंतर काही होत नाही. फडणवीस, तुमच्या पाहुण्यांना ईडीच्या नोटीस जाईल. त्यांनाही ईडीच्या नोटीस जातील. ईडीला दोन्ही कामे करावे लागतील. आमचेही लोक अर्ज देतील. ईडीला फक्त अंतरवालीच्या चौकशी करायच्या आहेत का? आम्ही त्यांच्या पाहुण्यांच्या विरोधात अर्ज करू. आंदोलनापासून लांब जावे, यासाठी फडणवीसांनी षडयंत्र रचलं आहे. आता त्यांचं पाहुणे कंत्राटदार असतील. नोकरीला कुठे असेल. कुठे इमारत बांधली असेल. दवाखाना असेल. काहीतरी असेल. त्यांनाही आता कळेल. असंच असतं. सोपं नाही. तुम्हालाही सहन करावे लागेल. फक्त अंतरावालीत दारू येत नाही. संपूर्ण जिल्ह्यात दारू बंदी झाली पाहिजे. सगळ्या गावांचा विकास झाला आहे का, त्या फाईल देखील बघितल्या पाहिजे. त्याचा पण विकास केला पाहिजे, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.
