मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचं प्रमाण प्रचंड वेगाने वाढत आहे. राज्यात रविवारी (11 एप्रिल) दिवसभरात तब्बल 63 हजारांपेक्षाही जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत चालला आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जातंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या 14 एप्रिलला कॅबिनेट बैठकीनंतर याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली (Rajesh Tope on Lockdown).
मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत चर्चा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (11 एप्रिल) राज्याच्या टास्क फोर्ससोबत बैठक घेतली. या बैठकीत लॉकडाऊन विषयी चर्चा झाली. टास्क फोर्समधील जवळपास सर्वच तज्ज्ञांचं मत हे लॉकडाऊन लागू करावं, याच बाजूने आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? याबाबत आरोग्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली (Rajesh Tope on Lockdown).
‘टास्क फोर्समधील अनेक सदस्यांची लॉकडाऊन करण्याबाबतची भूमिका’
“या बैठकीत लॉकडाऊनबाबत चर्चा झाली. राज्यात सध्या लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी टास्कफोर्समधील अनेक सदस्यांची भूमिका आहे. जरुर काही सदस्यांचं मत वेगळं असू शकतं. पण बहुतांश टास्क फोर्सचं मत लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असं मत होतं. याबाबत आता मुख्यमंत्री बुधवारी (14 एप्रिल) कॅबिनेट मिटिंग घेऊन चर्चा करुन योग्य निर्णय घेतील. त्यानंतर ते निर्णय घोषित करतील”, अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली.
‘मुख्यमंत्री 14 एप्रिलला निर्णय घोषित करतील’
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक-दोन दिवस अर्थ विभाग आणि इतर विभागांशी चर्चा करतील. त्यानंतर बुधवारी (14 एप्रिल) कॅबिनेट बैठकीत विषय मांडतील. तिथे चर्चा करुन याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुख्यमंत्री लॉकडाऊनबाबत घोषणा करतील”, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
राजेश टोपे यांनी सांगितलेले आणखी काही महत्त्वपूर्ण मुद्दे :
मुख्यमंत्र्यांची आधी सर्वपक्षीय बैठक
राज्यात कोरोना परिस्थिती बघता तातडीने आठ ते पंधरा दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याचा मुख्यमंत्र्यांच्या विचार आहे. याबाबत सर्वपक्षीय नेत्यांचे मत जाणून घेण्यासाठी त्यांनी शनिवारी (10 एप्रिल) बैठक घेतली. या बैठकीत विरोधकांनी सरकार जो निर्णय घेईल, त्याला आमचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलंय. मात्र, राज्यातील जनतेला लॉकडाऊन काळात दिलासा मिळावा, यासाठी सरकारने काहीतरी आर्थिक पॅकेज जाहीर कारावा, असं भाजपच्या नेत्यांचं मत आहे. याबाबत राज्य सरकार निश्चितच काही निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
संबंधित बातमी : मोठी बातमी ! लॉकडाऊन, रेमडेसिव्हीर इंजेक्शन ते ऑक्सिजनचा पुरवठा, टास्क फोर्सच्या बैठकीत पाच महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा