उन्हाचा प्रकोप… चक्कर, उलट्यांनी लोक हैराण, रुग्णालये सज्ज, शाळांच्या वेळा बदलल्या; प्रशासनाचा इशारा काय?

महाराष्ट्रात उष्माघाताचा तीव्र प्रकोप सुरू आहे, ज्यामुळे महिन्याभरात 8 मृत्यू झाले आहेत. चक्कर, उलट्यांसारख्या त्रासाने नागरिक हैराण आहेत. रुग्णालये सज्ज ठेवली असून, विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून शाळांच्या वेळा बदलल्या आहेत. प्रशासनाने दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या तापमानामुळे खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.

उन्हाचा प्रकोप... चक्कर, उलट्यांनी लोक हैराण, रुग्णालये सज्ज, शाळांच्या वेळा बदलल्या; प्रशासनाचा इशारा काय?
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Apr 28, 2026 | 2:34 PM

राज्यात गेल्या काही दिवसापासून उन्हाचा प्रचंड प्रकोप सुरू झाला आहे. राज्यात अवघ्या महिन्याभरातच उष्माघाताने 8 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं. दुपारी रणरणत्या उन्हाचे चटके बसत असल्याने अनेकांना उलट्या, मळमळ, भोवळं आदी प्रकारांसामोरे जावं लागत आहे. उष्माघातामुळे अनेक लोक आजारी पडण्याची शक्यता असल्याने जिल्ह्या जिल्ह्यात रुग्णालये सज्ज ठेवण्यात आले आहेत. तसेच अनेक ठिकाणी शाळांच्या वेळाही बदलण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याने दुपारच्यावेळी विनाकारण घराबाहेर पडू नका, असं आवाहन प्रशासाने केलं आहे.

जळगावमध्ये तापमानाचा पारा 44. 6 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. जळगावात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात तापमानाने 44 अंशांचा आकडा ओलांडला आहे. प्रचंड उन्हामुळे सकाळी 10 वाजताच रस्ते निर्मनुष्य झालेले दिसत आहेत. वाढत्या तापमानामुळे शाळांच्या वेळांमध्ये बदल कररण्यात आले आहेत. एप्रिलमध्ये सुरू राहणाऱ्या सीबीएससी स्कूल सकाळी 8 ते 10.30 वाजेपर्यंत भरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सकाळपासूनच उन्हाचे चटके बसत आहेत. उकाड्याचा त्रास होत असल्याने जळगावकर हैराण झाले आहेत. उकाड्याचा त्रास कमी करण्यासाठी मठ्ठाबरोबरच शीतपेयांच्या दुकानावर नागरिकांची गर्दी झाली आहे. वाढत्या तापमानापासून नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.

गोंदियात शाळा, अंगणवाड्यांच्या वेळा बदलल्या

विदर्भामध्ये उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून गोंदिया जिल्ह्यातही तापमानाचा पारा चांगलाच चढला आहे. वाढत्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी गोंदिया जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी गोंदिया जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाड्या आणि कोचिंग क्लासेसच्या वेळेत बदल करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि अंगणवाड्यांची वेळ आता सकाळी 7 ते सकाळी 10 वाजेपर्यंतच मर्यादित राहणार आहे. उष्णतेच्या लाटेची शक्यता लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे….

पनवेलमध्ये तरुण फुटपाथवर कोसळला

सायन–पनवेल महामार्गावर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खारघर पोलीस स्टेशनच्या पुढे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर दुचाकीवरून प्रवास करत असताना एका तरुणाला अचानक उष्णतेचा फटका बसला. अस्वस्थ वाटू लागल्याने त्या तरुणाने तात्काळ आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली. मात्र काही क्षणातच तो फुटपाथवर कोसळला. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक नागरिकांनी तातडीने जवळच असलेल्या वाहतूक पोलिसांना बोलावले. पोलिसांनीही तत्परता दाखवत त्या तरुणाला तात्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल केले. सध्या संबंधित तरुणावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

खटावचा तापमानाचा पारा 42 अंशांवर

सातारा जिल्हा अक्षरशः उन्हाने होरपळून निघत असून मान खटावचा तापमानाचा पारा तब्बल 42 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. सातारा शहरातही हा पारा 41 अंश सेल्सिअस वर पोहोचलेला आहे. तर थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वर मध्ये 34.5 अंश सेल्सिअस इतके तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तीव्र उन्हामुळे मान खटाव तालुक्यामध्ये काही गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अनेक भागात दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत असून अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासन करत आहे.

विहिरी, नाले आटले

वाशिम जिल्ह्यात तापमानात सातत्याने वाढ होत असून पारा 44 अंशांच्या आसपास पोहोचला आहे. कडक उन्हामुळे विहिरी, नाले आणि इतर जलस्रोत झपाट्याने आटत असल्याने प्रकल्पांमधील पाणीसाठा कमी होत आहे. वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात सध्या केवळ 26 टक्के जलसाठा शिल्लक असून, त्यामुळे शहरात 8 ते 12 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्येही केवळ 20.86 टक्के पाणीसाठा उरला आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अजूनही उन्हाळ्याचे दीड महिने बाकी असल्याने येत्या काळात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जालना जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट

जालना शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून काल 41.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून कुलाबा येथील प्रादेशिक हवामान विभागाकडून जालना जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहून खबरदारी घ्यावी अस आवाहन करण्यात आलंय. दुपारी उन्हाचा तडाखा वाढताच जालना शहरातील प्रमुख रस्ते सामसूम व्हायला सुरुवात झाली असून वाहनांची वर्दळही कमी झाल्याच चित्र पाहायला मिळतंय. दरम्यान आज देखील जालना शहरात तापमानाचा पारा हा 42 अंश पार करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

घराबाहेर पडू नका

पारा हा 45° अंशावर जाऊन पोहोचला आहे. वाढत्या तापमानामुळे जीवाची लाही लाही होत असून उन्हापासून बचाव करणारे टोपी रुमाल घेतल्याशिवाय बाहेर पडणं मुश्किल झाला आहे. दरम्यान वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका वाढला असून धुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. धुळे जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्षाची निर्मिती करण्यात आली असून दहा विशेष काटा या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आले आहेत. तर जिल्ह्यातील सहा उपजिल्हा रुग्णालयांचं दोन ग्रामीण जिल्हा रुग्णालयांमध्ये देखील उष्माघात कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा शलचिकित्सक रवींद्र सोनवणे यांनी दिली आहे. साधारणतः सकाळपासूनच उन्हाचे चटके बसू लागले असून दुपारनंतर रस्ते निर्माण होऊ लागले आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात तापमानाचा पारा चढताच असून घराबाहेर न पडण्याचा सल्ला प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

Follow Us