दिवसच नाही, रात्रही उकाड्याची… पुरेपूर काळजी घ्या, पुढचे पाच दिवस… हवामान खात्याच्या इशाऱ्याने निघाला घामटा
Maharashtra Heatwave Alert : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच रात्रीच्या तापमानातही वाढ होणार असल्याने नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या वातावरणात बदल पहायला मिळत आहे. राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता, मात्र आता पुढील पाच दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार यवतमाळचे तापमान वाढत चालले आहे आज पासून 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे . तसेच पुढचे पाच दिवस आणखी उष्णता वाढण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. वाढत्या उकाड्यामुळे लोक प्रचंड हैराण झाले आहे. गंभीर बाब म्हणजे दिवसासोबतच रात्रीचे तापमानही चिंताजनक वाढले असून सोमवारची रात्र यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वात उष्ण ठरली. रात्री 31.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे.
गोंदिया जिल्ह्याचे तापमान 44 अंशावर
गोंदिया जिल्ह्यात आज 44 अंश सेल्सिअस इतके तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. काल गोंदिया जिल्ह्याचे तापमान 42 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले होते तर आज तब्बल 2 अंश सेल्सिअसने तापमानात वाढ झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात घट झाली होती, मात्र आज अचानक तापमान वाढल्याने गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. पुढील काही दिवसांमध्ये आणखी तापमान वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे.
अमरावती आणि वर्ध्यात पारा 46 अंशांवर
अमरावतीत जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. आजचे तापमान 46 अंशावर गेले आहे. त्यामुळे सकाळपासून अमरावतीत उन्हाचे चटके जाणवत आहेत. पुढील चार दिवस अशाच पद्धतीने तापमानात वाढ होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर वर्ध्याचे तापमानही 46.5 अंश सेल्सिअसवर गेले आहे. कमाल सोबतच किमान तापमानातही वाढ झाली आहे. हवामान विभागाकडून तापमानामध्ये आणखी वाढ होण्याचा इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.
अकोल्यामध्ये उष्माघाताचा बळी?
अकोल्यामध्ये उष्माघाताचा बळी गेला आहे. अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मृतदेहाच्या अंगावर कुठल्याही मारहाणीचा तसेच जखमा नाहीयेत. मात्र जास्त प्रमाणात ऊन लागल्याने नाकफुटी होत रक्तस्त्राव झाला असावा, म्हणून या व्यक्तीचा कदाचित उष्माघातामुळे मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान अकोल्याचे तापमान 46.3 अंशांवर पोहोचले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात 43.4 तापमानाची नोंद
गडचिरोली जिल्ह्यात 43.4 तापमानाची नोंद झाली असून गडचिरोलीला लागत असलेले विदर्भातील अनेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट करण्यात आलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला लागून असलेला तेलंगणा राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील तापमानात प्रचंड वाढ होत असून नागरिकांना उन्हाचे चटके बसत आहेत. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचे रुग्ण मोठ्या संख्येत दिसत आहेत.