
मोठी बातमी समोर येत आहे, आज निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे, या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचं वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे या पत्रकार परिषदेपूर्वी आज पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे.
भेटीमध्ये नेमकी कशावर चर्चा?
आज पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळाच्या वतीनं निवडणूक आयोगाची भेट घेण्यात आली आहे. महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीनं निवडणूक आयोगाला नऊ मुद्द्यांचं पत्र देखील देण्यात आलं आहे. मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ आहे, जोपर्यंत हा घोळ संपत नाही, तोपर्यंत निवडणूक घेऊ नयेत, अशी भूमिका विरोधकांची आहे, याच पार्श्वभूमीवर आज देखील महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे, यावेळी मतदार याद्यांमधील घोटाळ्याबाबत जवळपास अर्धातास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
निवडणूक आयोगाची आम्ही आज पुन्हा भेट घेतली, निवडणुका जाहीर व्हायला नकोत म्हणून आम्ही विनंती केली आहे. जर मतदार याद्या या दोषपूर्ण असतील तर निवडणूक घेण्याला काय अर्थ आहे? निवडणूक लगेचच जाहीर होऊ नये, यासाठी देखील पत्र देण्यात आलं आहे, अशी माहिती यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आली आहे. तर दुसरीकडे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी या भेटीनंतर सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले बाळा नांदगावकर?
मतदार यादीमधील जो घोळ आहे, तो जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत मतदान घेऊ नका अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे. मतदार यादीत सुधारणा करावी, बोगस मतदारांची नावं यादीतून काढावी, अशी आमची मागणी आहे. या संदर्भात शिष्टमंडळाच्या वतीनं निवडणूक आयोगाला 9 मुद्द्यांचं एक पत्र देखील देण्यात आलं आहे. परंतु या भेटीनंतर आमचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे. एकीकडे आई जेऊ घालेणा अन् बाप भीक मागू देईल अशी परिस्थिती आहे. दबावाखाली काम सुरू आहे, असं आमच्या निदर्शनास आलं आहे, निवडणूक आयोगानं आम्हाला कोणताच सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, असं नांदगावकर यांनी म्हटलं आहे.