त्या गोष्टीचा मला सर्वांत जास्त त्रास..; घटस्फोट, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या चर्चांवर अखेर थलपती विजयने सोडलं मौन
लग्नाच्या 27 वर्षांनंतर थलपती विजयच्या पत्नीने घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. या अर्जात तिने विजयवर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप केला आहे. यावर आता थलपती विजयने पहिल्यांदाच मौन सोडलं आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता थलपती विजय एकीकडे राजकारणातील त्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी सज्ज असताना दुसरीकडे त्याचं खासगी आयुष्य तुफान चर्चेत आहे. विजयची पत्नी संगीता सोरनालिंगमने लग्नाच्या 27 वर्षांनंतर कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. इतकंच नव्हे तर तिने विजयवर एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चर्चांनी जोर धरला असताना अखेर त्यावर विजयची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात विजयने त्याच्या खासगी आयुष्यावरून असलेल्या कॉन्स्ट्रोवर्सीवर मौन सोडलं आहे.
विजयची प्रतिक्रिया
“माझ्याभोवती असलेल्या अलिकडच्या समस्यांबद्दल काळजी करू नका. कारण त्यावर तुम्ही तुमचा वेळ घालवण्याइतक्या त्या समस्या महत्त्वाच्या नाहीत. मी स्वत: त्यांची काळजी घेईन. माझ्या समस्यांमुळे तुम्हाला दु:खी किंवा तणावग्रस्त होताना पाहून मला सर्वांत जास्त त्रास होतो”, असं विजय कोणाचंही नाव न घेता म्हणाला. विजयची पत्नी संगीताने त्यांच्या वैवाहिक घरावर निवासी हक्क मागण्यासाठी नवीन याचिका दाखल केल्यानंतर त्याची ही प्रतिक्रिया विशेष चर्चेत आली आहे.
संगीताने त्यांच्या वैवाहिक घरात राहण्याची किंवा पर्यायी निवासी व्यवस्था मिळावी अशी मागणी कोर्टात केली आहे. कारण विजयने कथितपणे तिला म्हटलंय की जर तिने विभक्त होण्यासाठी कायदेशीर मार्गांचा अवलंब केला तर तिला वैवाहिक घरात राहण्याची परवानगी दिली जाणार नाही, असं तिने कोर्टात म्हटलंय. त्याचसोबत संगीताने योग्य आणि कायमस्वरुपी पोटगी देण्याचीही मागणी केली आहे. घटस्फोटाच्या कायदेशीर कारवाईदरम्यान बेघर होण्याची वेळ येऊ नये, म्हणून आधीच तिने कोर्टात याचिका दाखल केली आहे.
घटस्फोटाच्या अर्जात संगीताने विजयवर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. यानंतर विजय आणि अभिनेत्री तृषा कृष्णन यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला होता. अशातच थलपती विजय आणि तृषा कृष्णन यांनी एकत्र एका लग्नसोहळ्याचा हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्याला दोघं एकाच गाडीतून आले होते आणि जातानाही एकाच गाडीतून देले. इतकंच नव्हे तर यावेळी दोघांनी एकाच रंगसंगतीचे कपडे परिधान केले होते.
