
धुळे- भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आज धुळ्यात आहेत. नवनिर्वाचित नगरसेविकांबरोबर संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून महापालिकेच्या निवडणुकीनंतर चित्रा वाघ पहिल्यांदाच धुळ्यात आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नांदेड दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे. शिखांचे नववे गुरु तेग बहाद्दूरजी यांच्या 350 व्या शहिदी समागमनिमित्त आयोजित हिंद दि चादर कार्यक्रमानिमित्त ते नांदेडला येणार होते. काही तांत्रिक कारणास्तव दौरा रद्द झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
“भाजपात लोकं जातात कारण भाजप उत्तमपणे निवडणूक मॅनेज करू शकते. निवडणूक, ईव्हीएम, साम दाम व्यवस्थित करू शकतात. भुजबळ साहेबांना क्लीन चीट दिली, याचा अर्थ भुजबळसाहेब सत्यवादी आहेत. त्यांच्यावर आरोप करणारा मुलुंड एचडी व्हिडीओ स्पेशालिस्टने भुजबळांची माफी मागितली पाहिजे. उलट त्यांच्यावर अब्रूनुकसानकीचा दावा भुजबळांनी दाखल केला पाहिजे. भावना गवळी, अजितदादा, हसन मुश्रीफ, यासह अनेक लोकांना क्लीन चीट मिळाली,” अशी टीका सुषमा अंधारेंनी केली.
हा महाराष्ट्र संत चोखोबा संत तुकाराम संत नामदेव महाराजांचा आहे, त्यामुळे महाराष्ट्र हिरवा करायचा ते कोणत्या अर्थाने बोलले हे मला माहिती नाही.परंतु हा महाराष्ट्राची भगवी पताका आज नाही तर वर्षानुवर्ष खांद्यावर घेऊन हा महाराष्ट्र सातत्याने भगवी पताका खांद्यावर घेत त्याच विचाराचा राहिलेला आहे त्यामुळे अशा बोलण्याला काही अर्थ नाही असा टोला अंबादास दानवे यांनी जलील यांना लगावला.
धाराशिवमध्ये मी प्रत्यक्ष भेट देणार आहे.नाराजी मुळीच नाही. राजन साळवी यांच्या बाबतीत चुकीचे आरोप होताय, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. महायुतीच्या जागावाटपाबाबत आरोप प्रत्यारोप होत राहतात. निवडणूक संपली आहे. याच बाबतीत चर्चा करत राहिले तर ३६५ दिवस कमी पडतील. आता चर्चा जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
परिवहन मंत्र्यांच्या परळ डेपो पाहणीत एसटीचे चालक वाहक मद्यधुंद अवस्थेत आढळले. संबंधित चालक वाहकांवर तात्काळ कारवाई करण्याचे प्रताप सरनाईक यांनी आदेश दिले.ब्रेथ अनालायझरने सर्व चालक वाहकांची तपासणी करण्याचे देखील प्रताप सरनाईक यांनी आदेश दिले.प्रताप सरनाईक यांना चालक वाहकांच्या रेस्ट रूममध्ये दारूच्या बाटल्या आढळल्या. तात्काळ चौकशी समिती नेमून या सर्व प्रकरणाची माहिती सादर करण्याचे प्रताप सरनाईक यांचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले.बस स्थानकात सीसीटीव्ही कार्यान्वित करण्याचे, गरज भासल्यास नवे सीसीटीव्ही तात्काळ विकत घेण्याचे प्रताप सरनाईक यांनी निर्देश दिले.
गेल्या साडेतीन वर्षापासून शिवसेना कोणाची हा खटला तीन वर्षांपासून टेबलावर आहे हे महाशय तारीख पे तारीख देत आहे या घटनाबाह्य शिंदे गटाने ४ निवडणुका लढले.काल जस्टिस सूर्यकांत मुंबईला उतरले प्रोटोकॉल नुसार त्या विभागाचे सचिव जायला हवे होते ते न जात राजकारणी काल त्यांच्या स्वागताला गेले. ज्यांचा खटला सुरू आहे त्यांच्याकडून सत्कार स्वीकारला हे अनैतिक आहे. ताज पॅलेस मध्ये भेट मिळावी म्हणून एकनाथ शिंदे हे तिथे बराच वेळ होते. हे जर असेच सुरू राहिले तर या न्यायव्यवस्थे वर उरला सुरला जो विश्वास आहे तो उडून जाईल. जस्टिस सूर्यकांत हे जर संविधानाचे पाहरेकरी असतील तर हे असे करू शकता. काल ते म्हणाले जस्टिस डिले इज़ जस्टिस डिनाय नॉट ओन्ली डिनॉय इज़ जस्टिस डिस्ट्रॉय हे तेच म्हणत आहे शिवसेना चा निर्णय अजून झाला नाही जस्टिस सूर्यकांत यांना राजकारणात यायचे आहे म्हणून हे सगळे करत आहे. न्यायव्यवस्था ही अमित शाहच्या (पायाखाली) अंगट्या खाली चिरडली जाईल, असा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केला.
सोलापूरच्या माढ्यात दोन्ही राष्ट्रवादीतील युतीनंतर वाद विकोपाला पोहचला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते दादासाहेब साठेना मानेगावची उमेदवारी आमदार अभिजीत पाटील यांनी डावलली.उमेदवारी डावलल्याने माढ्यात आमदार अभिजीत पाटलांच्या विरोधात निषेध करणारे बॅनर लागले.उमेदवारी हवी असल्यास माढा नगरपंचायतची निवडणुक न लढविण्याची अट स्टॅम्प पेपरवर लिहुन देण्याची मागणी आमदार अभिजीत पाटलांनी केल्याचा आरोप दादासाहेब साठेनी केलाय.शरद पवारांसमोर विधानसभेला साठेनी दिलेला शब्द पाळला नाही.साठेनी विश्वासार्हता गमावलि आहे.त्यामुळे त्यांना स्टॅम्प वर लिहुन मागीतले असल्याचे आमदार पाटील यांनी स्प्षट केले आहे. स्टॅम्प पेपर वर लिहुन देण्याचा मागितलेला हा विषय राज्यभरात चर्चेचा ठरतो आहे.
सांगलीत आज राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त भव्य अशी जनजागृती रॅली काढण्यात आली. सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या उपस्थितीत ही जनजागृती रॅली काढण्यात आली. या मतदार जनजागृती रॅलीमध्ये महाविद्यालयाचे तरुण तरुणी विद्यार्थी शिक्षक विविध सामाजिक संस्था यांनी सहभाग घेतला होता. यावेळी मतदार दिवसा निमित्त जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सर्वांना मतदान करण्याची शपथ दिली. यानंतर सांगलीतील प्रमुख मार्गावरून मतदार जनजागृती रॅली काढत लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा असा संदेश देण्यात आला. सांगली जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा निवडणूक विभागाकडून नीता शिंदे आणि अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे यांनी या रॅलीचे आयोजन केलं होतं.
पंढरपूर येथे होणाऱ्या माघीवारीनिमित्त सोलापुरात पहिले गोल रिंगण पार पडले. माघीवारी निमित्त भगवे ध्वज घेत शेकडो वारकऱ्यांसह गोल रिंगण सोहळा संपन्न झाला. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताई यांची पालखी आल्यानंतर गोल रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली. शहरातील नार्थकोट प्रशालेच्या प्रांगणामध्ये गोल रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गोल रिंगणासाठी मृदंग वादक, डोक्यावर तुळस घेऊन महिला भगिनींचा सहभाग पाहायला मिळाला. मागील 200 वर्षांपासून सोलापूर ते पंढरपूर माघवारी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येतेय.
गाडीच्या धडकेत मायले का सह तिघे जखमी. संताप्त जमावाकडून धडक देणाऱ्या कारची तोडफोड. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील तीन ते चार लोकांना दिली जोरदार धडक. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
माघीवारी निमित्त भगवे ध्वज घेत शेकडो वारकऱ्यांसह गोल रिंगण सोहळा संपन्न. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताई यांची पालखी आल्यानंतर गोल रिंगण सोहळ्याला सुरवात. शहरातील नार्थकोट प्रशालेच्या प्रांगणामध्ये गोल रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गोल रिंगणासाठी मृदंग वादक, डोक्यावर तुळस घेऊन महिला भगिनींचा सहभाग पाहायला मिळाला
गुलाबराव पाटील हे नकली मंत्री असल्याने अशी भाषा करतात म्हणत संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
बिहार भवनाला जागा देत आहोत, हे देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत जाहीर करावे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
उपमहापौर आणि गटनेता पदासाठी जालन्यात रस्सीखेच होण्याची शक्यता,इच्छुकांकडून नेतेमंडळीकडे लॉबिंग करण्यास सुरुवात. महापौर पदाच्या आरक्षण सोडतीमुळे भास्कर दानवे आणि कैलास गोरंट्याल यांना फटका नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर जालना महानगरपालिकेच्या पहिल्यांदाच निवडणुका झाल्या आणि यामध्ये भाजपने 41 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. येत्या 30 जानेवारीला जालना महानगर पालिकेचा महापौर ठरणार आहे.
नागपूर महानगरपालिका निवडणुकीतील पिछाडीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर शहरात संघटनात्मक बदलांचे मोठे पाऊल उचलले आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीपत्रकाद्वारे नागपूरची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, किशोर कुमरिया यांची महानगर प्रमुख पदी वर्णी लागली आहे. महापालिका निवडणुकीत पक्षाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागल्याने आणि निवडणूक काळात तत्कालीन शहरप्रमुख नितीन तिवारी व किशोर कुमरिया यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने हे फेरबदल महत्त्वपूर्ण मानले जात आहेत. संघटनेची पकड मजबूत करण्यासाठी शहराची विभागणी करत हरिभाऊ बानाईत, विक्रम राठोड आणि संदीप पटेल या तिघांची ‘शहरप्रमुख’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नव्या टीमसमोर आगामी काळात नागपूर शहरात शिवसेना पुन्हा उभारी देण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे प्रस्तावित असलेली सर्व विकासकामे मार्च २०२७ पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी डवले यांनी विविध शासकीय यंत्रणांद्वारे सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता पायाभूत सुविधा, रस्ते आणि नियोजित कामांना गती देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. या बैठकीमुळे सिंहस्थ कामांच्या नियोजनाला आता अधिक वेग येण्याची शक्यता आहे.
नाशिक महानगरपालिका निवडणुकीत ७२ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाने महापालिकेत ‘नवे नेतृत्व’ देण्याची तयारी सुरू केली आहे. पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी आणि कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी यावेळेस वादग्रस्त चेहऱ्यांना पूर्णपणे डावलण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. ज्या नेत्यांमुळे किंवा कार्यकर्त्यांमुळे पक्षाची बदनामी झाली किंवा ज्यांनी पक्षात राहून चुकीची कामे केली, त्यांना महापौर, उपमहापौर किंवा स्थायी समिती सभापती यांसारख्या महत्त्वाच्या पदांपासून दूर ठेवले जाणार आहे. या संदर्भातील एक सविस्तर अहवाल तयार करण्यात आला असून तो प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. आगामी काळात नाशिकमध्ये भाजपचे नवे आणि निष्कलंक चेहरे महापालिकेची धुरा सांभाळताना दिसणार आहेत.
नागपूर महानगरपालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सुटल्याने आता या पदावर कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या निवडीचा अधिकृत प्रस्ताव महानगरपालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आला असून, त्यांच्या स्वाक्षरीनंतर तो विभागीय आयुक्तांकडे पाठवला जाईल. प्राप्त माहितीनुसार, येत्या ४ फेब्रुवारी रोजी महापौर निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, सत्ताधारी भाजपमध्ये अनेक महिला नेत्यांनी या पदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून विविध नावांची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत ३३ जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या एमआयएमने (AIMIM) आता आपला राजकीय विस्तार ग्रामीण भागात करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात मिळवलेल्या घवघवीत यशानंतर पक्षाने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उडी घेतली आहे. एमआयएमने जिल्हा परिषदेच्या ६ गटांत आणि पंचायत समितीच्या १५ गणांत आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजप-शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या संघर्षात आता एमआयएमच्या एन्ट्रीमुळे ग्रामीण भागातील निवडणुकीत चौरंगी लढत पाहायला मिळणार असून, यामुळे प्रस्थापित पक्षांच्या व्होट बँकेला सुरुंग लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने निवडणूक पार पडल्यानंतर, आता नवनिर्वाचित नगरसेवकांसमोर प्रभागातील विकास कामे मार्गी लावण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. ही अडचण लक्षात घेऊन मनपा प्रशासनाने राज्यातील इतर मोठ्या महानगरपालिकांच्या धर्तीवर प्रत्येक नगरसेवकाला वार्षिक ५० लाख रुपयांचा स्वेच्छा निधी उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू केला आहे. प्रभाग रचनेनुसार, एका प्रभागात चार नगरसेवक असल्यास त्या संपूर्ण प्रभागासाठी वार्षिक २ कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात केली जाणार आहे. महापालिकेतील एकूण ११५ नगरसेवकांसाठी सुमारे ५७ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद आगामी अर्थसंकल्पात केली जाण्याची दाट शक्यता असून, यामुळे रस्ते, पाणी आणि स्वच्छतेच्या स्थानिक कामांना गती मिळणार आहे.
भिवंडी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका आणि महापौर पदाच्या शर्यतीसाठी शहरातील राजकीय वातावरण आता कमालीचे तापले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि समाजवादी पक्ष यांनी एकत्र येत भिवंडी सेक्युलर फ्रंटची अधिकृत घोषणा केली आहे. या महाआघाडीमुळे सत्ताधारी गटासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळणे आणि शहराच्या विकासासाठी एक समान कार्यक्रम राबवणे हा या फ्रंटचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी महापौर पदावर आपला झेंडा फडकवण्यासाठी आतापासूनच प्रभागांनुसार मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून, या नव्या युतीमुळे भिवंडीतील प्रस्थापित राजकीय गणिते पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिकेवर भगवा कोणाचा फडकणार आणि राज्याचा प्रथम नागरिक होण्याचा मान कोणाला मिळणार, याचा फैसला आता अंतिम टप्प्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आज वर्षा निवासस्थानी एक अत्यंत महत्त्वाची बैठक होण्याची दाट शक्यता आहे. या संभाव्य बैठकीत मुंबईसह ठाणे, पुणे आणि नाशिकसारख्या महत्त्वाच्या महापालिकांमधील सत्तास्थापनेच्या सूत्रावर चर्चा होऊ शकते. मुंबईतील संख्याबळाची जुळवाजुळव, मित्रपक्षांची भूमिका आणि अपक्षांना सोबत घेण्याची रणनीती यावर दोन्ही नेते शिक्कामोर्तब करण्याची चिन्हे आहेत. महायुतीचा महापौर बसवण्यासाठी जागावाटपाचा कोणता फॉर्म्युला ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीनंतर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.