Maharashtra Municipal Election : 2869 जागांसाठी 33 हजारहून अधिक अर्ज; कोणत्या शहरात किती उमेदवार रिंगणात?

महाराष्ट्र महापालिका निवडणुकीसाठी २९ शहरांमध्ये रणधुमाळी उडाली असून, एकूण ३३,६०६ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. पुणे आणि मुंबईत सर्वाधिक चुरस पाहायला मिळत असून मालेगावात पहिली जागा बिनविरोध निघाली आहे.

Maharashtra Municipal Election : 2869 जागांसाठी 33 हजारहून अधिक अर्ज; कोणत्या शहरात किती उमेदवार रिंगणात?
municipal corportation election
| Updated on: Jan 01, 2026 | 10:27 AM

राज्यातील महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाराष्ट्रात २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा धुरळा सध्या पाहायला मिळत आहे. या सर्व महापालिकांसाठी येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान पार पडणार आहे. तर लगेचच दुसऱ्या दिवशी १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. या महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निवडणूक आयोगाच्या अंतिम अहवालानुसार राज्यातील २९ महापालिकांसाठी तब्बल ३३ हजार ६०६ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. आता कोणत्या महापालिकेत किती अर्ज दाखल झाले, याची सविस्तर आकडेवारी समोर आली आहे.

यंदाच्या महापालिका निवडणुकीत राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे. राज्यातील २ हजार ८६९ नगरसेवक पदांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत राजकीय पक्षांसह अपक्षांनीही मोठ्या प्रमाणावर कंबर कसली आहे. तर पुणे महानगरपालिकेत सर्वाधिक ३,१७९ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. तसेच मुंबई महापालिकेत २२७ जागांसाठी २,५१६ जणांनी शड्डू ठोकला आहे. नाशिक, पिंपरी-चिंचवड आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांमध्येही उमेदवारांची संख्या मोठी असल्याने अनेक ठिकाणी चौरंगी किंवा पंचरंगी लढती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महानगरपालिका एकूण जागा उमेदवारी अर्ज
पुणे १६५ ३,१७९
मुंबई (BMC) २२७ २,५१६
नाशिक १२२ २,३५६
पिंपरी-चिंचवड १२८ १,९९३
छत्रपती संभाजीनगर ११५ १,८७०
सोलापूर १०२ १,४६०
नागपूर १५१ १,४५२
ठाणे १३१ १,१२८
नवी मुंबई १११ ९५६
वसई-विरार ११५ ९३५

पुण्यात सर्वाधिक अर्ज

दरम्यान यंदा पुणे महानगरपालिकेत सर्वाधिक चुरस पाहायला मिळत असून येथे १६५ जागांसाठी ३,१७९ अर्ज आले आहेत. देशातील श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबईत २२७ जागांसाठी २,५१६ उमेदवार नशीब आजमावत आहे. विशेष म्हणजे शेवटच्या दिवशी सर्वाधिक अर्ज दाखल झाले. नाशिकमध्ये २,३५६ तर पिंपरी-चिंचवडमध्ये १,९९३ अर्जांसह मोठी स्पर्धा आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर (१,८७०), सोलापूर (१,४६०) आणि नागपूर (१,४५२) येथेही उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे.

दरम्यान निवडणुकीपूर्वीच मालेगावमध्ये एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखालील ‘इस्लाम पक्षा’ने आपले खाते उघडले आहे. प्रभाग ६ मधील उमेदवार मुनिरा शेख फकीर मोहम्मद यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाल्यामुळे किंवा मागे घेतल्यामुळे मुनिरा शेख यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. हा विजय इस्लाम पक्षासाठी ऐतिहासिक मानला जात असून कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून जल्लोष साजरा केला.